
चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – जिल्ह्यातील अवैध रेती वाहतुकीच्या वाढत्या तक्रारी आणि माफियांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी चंद्रपूरचे नवीन पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी कडक पावले उचलली आहेत. त्यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे जिल्ह्यातील अवैध रेती साम्राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमका प्रकार ? गेल्या काही वर्षांपासून सावली,मुल,सिंदेवाही आणि ब्रह्मपुरी यांसारख्या तालुक्यांतून मोठ्या प्रमाणावर अवैध रेतीची वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले होते.भरधाव वेगाने धावणाऱ्या रेतीच्या ट्रक मुळे ग्रामीण भागातील रस्ते खराब झाले असून, अपघातांचा धोका वाढला आहे.तसेच,धूळ आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.विशेष म्हणजे,एकाच नंबर प्लेटवर 5 ते 6 ट्रक चालवले जात असल्याचा धक्कादायक आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
पोलीस कारवाईची धग नवीन पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर जिल्ह्यातील (LCB) आणि पोलीस यंत्रणेने अवैध रेती वाहतुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. या कडक धोरणामुळे, जे ट्रक काही दिवसांपूर्वीपर्यंत बिनधास्तपणे रस्त्यावरून धावत होत.ते आता अचानक दिसेनासे झाले आहेत.या अचानक गायब झालेल्या ट्रक मुळे माफियांच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिकांच्या अपेक्षा केवळ वाहनचालकांवर कारवाई न करता,या संपूर्ण अवैध व्यवसायामागील ” मुख्य सूत्रधार ” कोण आहेत आणि त्यांना कोणाचे अभय आहे.याचा शोध घेणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.महसूल विभागाच्या सीमा ओलांडून सुरू असलेल्या या गोरखधंद्याला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई करावी,अशी मागणी जोर धरत आहे.
आगामी काळात,अवैध रेती वाहतुकीच्या या जाळ्याची सखोल चौकशी होऊन दोषींवर गुन्हे दाखल होतील का,याकडे आता संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.















