अहमदनगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाची तात्काळ दुरुस्ती न झाल्यास खडका येथील टोल नाका कायमचं बंद करू : अभिजीत दादा पोटे

0
66

अहमदनगर संभाजीनगर महामार्गावरील खडका फाटा टोल नाका प्रहार जनशक्ती पक्ष कायमचा बंद करणार : अभिजीत पोटे

जालिंदर आल्हाट
ब्युरो चीफ
प्रबोधिनी न्यूज

अहमदनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असलेल्या खडकाफाटा येथील केटी संगम टोलनाक्यावर रस्ता सुरक्षा अधिनियमाचे पूर्णतः उल्लंघन होत असल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष अभिजीतदादा पोटे यांनी प्रहारच्या टीम सह सदर ठिकाणी पाहणी केली. यावेळी शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पूर्णतः उल्लंघन होत असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष श्री. पोटे यांनी या टोल नाक्याच्या परिसराची संपूर्ण पाहणी करून येथील वास्तविकता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेसमोर मांडली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, दरवर्षी रस्ता सुरक्षा समितीच्या होणाऱ्या बैठकीमध्ये या रस्त्याच्या संदर्भात प्रहारच्या वतीने वेळोवेळी भूमिका मांडून सदरील रस्ता अतिशय धोकादायक झालेला असल्याने या रस्त्याने वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना टोल देण्याइतकी या रस्त्याची अवस्था आहे का? हा प्रश्न उपस्थित केला. हा टोलनाका निर्माण होऊन सुमारे पंधरा वर्षांचा कालखंड उलटूनही या ठिकाणी प्रवाशांसाठी असणाऱ्या विविध सुविधा नसल्याने स्वच्छ पिण्याचे पाण्याची, स्वच्छतागृहे आदी अत्यंत महत्वाच्या मूलभूत अशा सुविधा नसल्याने प्रवाशांची, महिलांची, दिव्यांगांची, सामान्य नागरिकांची मोठी कुचंबना होत आहे. तसेच टोल नाक्यावर लहान – मोठी वाहने ये – जा करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसून नाक्यावरच मोठ्या प्रमाणात रस्ता खराब असल्याने अपघात होण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात आढळून येते. केटी संगम यांनी शासनाबरोबर केलेल्या कराराच्या अनुषंगाने आज या ठिकाणी कोणतीच सुविधा उपलब्ध नसून रस्ता सुरक्षा नियमांनाही केराची टोपली दाखवलेली दिसून येते. तसेच रस्त्यामध्ये असणाऱ्या दुभाजकावर किमान साडेतीन फूट झाडे असणे बंधनकारक आहे. कारण रस्त्याच्या दोन्ही बाजूने रात्रीच्या वेळी वाहनांचा प्रकाश एकमेकांवर पडणार नाही. रस्त्यावरील गावानजीक गतिरोधक नसल्याने तसेच काही ठिकाणी असूनही त्यावर पांढऱ्या रंगाचे पट्टे नसल्याने वाहनासह वाहन चालकाला उपचाराची गरज पडते. यामुळे अनेकांना कायमचे अपंगत्वही आलेले आहे. तसेच रस्त्यावर अरुंद रस्त्याचे, वळण – दिशा दर्शवणारे, अरुंद पुलाचे फलक नसल्याने तसेच रस्त्याच्या मधोमध पांढऱ्या रंगाचे पट्टे देखील मारलेली नाही. अनेक ठिकाणी रस्ता फुटल्याने वाहनांना जाणे येण्यासाठी कसरत करून जीव धोक्यात घालावा लागत आहे. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहने घासून, टायर फुटून, वाहने पलटी होऊन मोठ्या प्रमाणात अपघात होणे ही दैनंदिन बाब झालेली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही त्यांनी याकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. तसेच टोल नाक्याचे ठेकेदार व त्यांच्यावर नियंत्रण असणारे जागतिक बँकेचे प्रकल्प अधिकारी हे देखील या टोलनाक्याकडे केवळ उत्पन्नाचे साधन म्हणून बघत असून नागरिकांसाठी, प्रवासासाठी असणाऱ्या सुविधेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे निदर्शनात येते.
प्रहार जनशक्ती पक्षाच्या मार्फत रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अहमदनगर यांचेकडे याबाबत रीतसर तक्रार करून या टोलनाक्यावर प्रवाशांसाठी असणारी सुविधा उपलब्ध करून न दिल्यास तसेच रस्त्यची कायमस्वरूपाची दुरुस्ती न केल्यास हा टोला कायमस्वरूपी बंद करून त्याचे नाव निशाणही मिटविले जाईल असा अल्तीमेट यावेळी जिल्हाध्यक्ष अभिजीतदादा पोटे यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here