
एटापल्ली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : ग्रामपंचायत गट्टा अंतर्गत येणाऱ्या येरदळमी गावातील रामचंद्र लेकामी यांच्या घरासमोरील सौर ऊर्जेवर आधारित दुहेरी नळ अखेर दुरुस्त करण्यात आला आहे. त्यामुळे गावातील आदिवासी नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मोठी सोय झाली असून दिलासा मिळाला आहे.
मागील काही महिन्यांपासून हा नळ बंद अवस्थेत असल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. विशेषतः महिलांना दूरवर जाऊन पाणी आणावे लागत होते. उन्हाळ्याच्या दिवसांत ही समस्या अधिकच तीव्र झाली होती.
या समस्येच्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा)चे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांच्याकडे मदत मागितली होती. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन त्यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत नळ तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली.
त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून संबंधित विभागाने तातडीने दखल घेत नळाची दुरुस्ती पूर्ण केली. सध्या हा सौर नळ पुन्हा सुरू झाला असून गावकऱ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे.
या कामामुळे येरदळमी गावातील आदिवासी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण असून त्यांनी भाकपा व कॉ. सचिन मोतकुरवार यांचे आभार व्यक्त केले आहेत.















