नाट्यश्री कविता स्पर्धेतील चाळीसाव्या सत्रात विलास जेंगठे व प्रभाकर दुर्गे विजयी

0
106

गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली’ च्या वतीने “आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता” हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते. या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते. या कवितेला “आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी” म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते.
या उपक्रमाचे चाळीसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात ३६ कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून स्पर्धेचे हे चाळीसावे सत्र असल्याने यावेळी दोन कवींना सन्मानित करण्यात आले आहे. त्यात गडचिरोली जिल्ह्यातीलच खेडेगावातील दोन कवींनी बाजी मारली आहे.
गडचिरोली तालुक्यातील नवोदित कवी विलास जेंगठे व मुलचेरा तालुक्यातील प्रसिद्ध कवी प्रभाकर दुर्गे या दोन कवींची आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून निवड करण्यात आली असून, त्यांच्या अनुक्रमे “जात” व “आर्त किंकाळी वीर मातेची” या कवितांची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे, कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.
विलास जेंगठे हे दिभना (ता.गडचिरोली) येथील नवोदित कवी असून ते शेतकरी आहेत. शेती करुन व भाजीपाला विकून ते आपला उदर्निर्वाह करतात. त्यांनी नुकतीच कविता लेखनास सुरुवात केलेली आहे. तर प्रभाकर दुर्गे हे मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली चक या अती दुर्गम भागात राहतात. ते परिवर्तनवादी कविता व चळवळीच्या कविता लिहीतात. अनेक कवितांचे लेखन त्यांनी केलेले आहे. विविध पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. या दोन खेडेगावातील नवोदित साहित्यिकांना नाट्यश्रीच्या स्पर्धेत एकाच वेळी पुरस्कृत करण्यात येत आहे.
त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे व प्रा. अरुण बुरे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी दोघांचेही अभिनंदन केले आहे.
या चाळीसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने प्रा. पी.एस. बनसोडे, माधुरी अमृतकर, अजय राऊत, गणेश रामदास निकम, रेखा दिक्षित, वामन गेडाम, संगीता ठलाल, लता शेंद्रे, संतोष कपाले, राजेंद्र यादव सोनटक्के, चरणदास वैरागडे, संगीता रामटेके, रोहिणी पराडकर, मुरलीधर खोटेले, कु.भावना रामटेके, भिमानंद मेश्राम, पुनाजी कोटरंगे, वामनदादा गेडाम, सुनिल चडगुलवार, ऊकंडराव नारायण राऊत, प्रभाकर दुर्गे, तुळशीराम उंदीरवाडे, प्रिती ईश्वर चहांदे, सोनाली रायपुरे- सहारे, मधुकर दुफारे, यामिनी मडावी, वंदना सोरते, प्रियंका ठाकरे, गजानन गेडाम,किशोर बोरकुटे, राजरत्न पेटकर, खुशाल म्हशाखेत्री, विलास जेंगठे, ज्योत्स्ना बन्सोड, शैला चिमड्यालवार, सुजाता अवचट इत्यादी कविंनी सहभाग नोंदविला होता.
या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
– चुडाराम बल्हारपुरे (नाटककार)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here