वैदू हा वनौषधीच्या माध्यमातून जनतेची सेवा करणारा आरोग्य दूत – पालकमंत्री डॉ. अशोक उईके

0
58

प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात एक दिवसीय वैदू संमेलन

चंद्रपूर – दि. 9 जून : पारंपरिक उपचार पध्दती ही भारताची देण असून जंगलातील वनौषधीच्या माध्यमातून जनतेची सेवा करणारा गावातला आरोग्य दूत म्हणून वैदूने (ग्राम वैद्य) स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले.
वन विभागाच्या वतीने प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात आयोजित वैदू संमेलनात ते बोलत होते. यावेळी मंचावर खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार सर्वश्री किशोर जोरगेवार, करण देवतळे, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे संचालक प्रभुनाथ शुक्ला, उपसंचालक आनंद रेड्डी, कुशाग्र पाठक, सुभाष कासनगुट्टूवार, नामदेव डहाळै, एस. एच. पाटील आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील वैदूंसोबत संवाद आणि संपर्क व्हावा, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, ग्रामीण भागात आजही वैदूंवर विश्वास आहे. तो समर्पणातून सेवा करतो. वैदूंजवळ असलेल्या ज्ञानाचा फायदा वनऔषधींच्या माध्यमातून जनतेला व्हायला पाहिजे. त्यामुळे आपल्याजवळ असलेले ज्ञान लिखित स्वरूपात ठेवावे. तुमचा अनुभव, तुमचे ज्ञान, तुमच्या कुटुंबांना अवगत करा. वनऔषधीतून उपचार करण्याची पद्धती इतरांनाही सांगा. त्यामुळे भविष्यात वनऔषधी पासून अनेक रुग्ण बरे होऊ शकतात. असे केले तरच पारंपारिक ज्ञान जिवंत राहील.

ज्ञानाचे रूपांतर लिखित स्वरूपात असेल तर तुमच्या नंतर त्याचा फायदा नागरिकांना होईल. जे वैदू किंवा ग्रामवैद्य जंगलातून वनउपज जमा करतो त्यांना मानधन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. वैदूंची उपचार पद्धती आजही महत्त्वाची आहे. त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी पालकमंत्री म्हणून नक्कीच प्रयत्न करू. हे केवळ एक दिवसाचे संमेलन नव्हे तर येणाऱ्या काळात वैदूंना न्याय देण्यासाठी अशा प्रकारच्या संमेलनाचे आयोजन करण्यात येईल. तसेच वनऔषधी गोळा करण्यासाठी वनविभागाने त्यांना ओळखपत्र द्यावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिल्या.
आयुर्वेद उपचार मानवी जीवनास मिळालेले वरदार : आमदार किशोर जोरगेवार
वनविभागाने आयुर्वेदिक व पारंपारिक उपचार पद्धतीला चालना देण्याचे काम सुरू केले आहे. आयुर्वेद उपचारपद्धती ही मानवी जीवनाला मिळालेले वरदान असून आयुर्वेदामुळे रोगाचे समूळ उच्चाटन होते, असे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, जंगलातून वनस्पती औषधी लुप्त होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या 10 कोटी वृक्षारोपण मोहिमेत औषधी वनस्पतींची लागवड करावी. तसेच ज्या ठिकाणी आयुर्वेदांनुसार उपचार केले जातात, अशा प्रसिध्द गावांची यादी सुद्धा प्रसिद्ध करावी. वैदूंना उदरनिर्वानासाठी काही रक्कम देण्यात यावी किंवा मानधन सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली.
आमदार करण देवतळे म्हणाले, चंद्रपूर भागात मोठ्या प्रमाणात जंगल आणि वनस्पती आहे. आयुर्वेदासाठी उपयुक्त वनस्पती आपल्या जिल्ह्यात आढळते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आयुर्वेदाबद्दल चांगले मार्गदर्शन होईल, सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्यासह डॉ. सूर्यप्रकाश गभणे, डॉ. एस. एच. पाटील यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. तत्पुर्वी महाराष्ट्रातील वनऔषधी वनस्पती या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे संचालक प्रभुनाथ शुक्ला यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here