आयुष्मान भारत प्रधानमंत्री व महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा आढावा
नम्रता सरदार मुख्य संचालिका प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर – दि. 13 जून : नागरिकांच्या आरोग्याला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. केंद्र शासनातर्फे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व राज्य शासनातर्फे महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना राज्यात एकत्रितपणे 23 सप्टेंबर 2018 पासून राबविण्यात येत आहे. या योजनांची आणखी प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठीव गरजू रुग्णांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी शासकीय पॅनलवर खाजगी रुग्णालयांची संख्या वाढविणे आवश्यक आहे, त्या दृष्टीने आरोग्य विभागाने नियोजन करावे, अशा सुचना आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे एकत्रित प्रधानमंत्री आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी आमदार देवराव भोंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, मा.सां. कन्नमवार शास. वैद्य. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडाते, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, महानगर पालिकेच्या वैद्य. अधिकारी डॉ. नयना उत्तरवार आदी उपस्थित होते.
प्रधानमंत्री आयुष्मान भारत प्रधानमंत्री व महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत 1356 आजारांवर उपचार व शस्त्रक्रियांचा समावेश आहे, असे सांगून डॉ. शेटे म्हणाले, यात आणखी आजारांचा समावेश करण्यात येणार आहे. रुग्णांना स्थानिक स्तरावरच तात्काळ चांगली आरोग्य सेवा मिळावी, असा शासनाचा मानस आहे. त्यासाठीच जास्तीत जास्त खाजगी रुग्णालयांना शासकीय पॅनलवर समाविष्ठ करण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे. पॅनलवर येणा-या खाजगी रुग्णालयांसाठी चांगले पॅकेज तयार करण्यात येत असून सदर निधी 30 दिवसांत संबंधित रुग्णालयाला वळता करण्यात येईल. आरोग्यासाठी शासन स्तरावरून निधीची कमतरता होणार नाही.
पुढे ते म्हणाले, चंद्रपूर हा आदिवासी बहुल जिल्हा असल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना चांगली आरोग्य सेवा पुरविणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे शासकीय पॅनलवर खाजगी रुग्णालयांचा समावेश होण्यासाठी जास्तीत जास्त रुग्णालयांकडून अर्ज मागवा. तसेच अर्ज आलेल्या रुग्णालयांना संवेदनशीपणे समाविष्ठ करून घ्या. पुरवठा विभागाच्या समन्वयाने जास्तीत जास्त नागरिकांच्या शिधापत्रिकांचे केवायसी केल्यास आयुष्मान कार्ड काढणे सोयीचे होईल. आरोग्याचा आपला डेटा संग्रहीत ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. येत्या काही दिवसांत ‘मिशन संजीवनी’ हा प्रकल्प लाँच होणार असून यात विविध प्रकारचे ट्रॉन्सप्लाँट करणे शक्य होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
पॅनलवर असलेल्या रुग्णालयांबाबत जनजागृती करावी : आमदार देवराव भोंगळे
प्रधानमंत्री आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्याला मिळणे आवश्यक आहे. या योजना प्रभावीपणे राबवायच्या असेल तर खाजगी रुग्णालयांची संख्या वाढविण्या शिवाय पर्याय नाही. जे खाजगी रुग्णालय स्वत:हून पुढे येत असतील, त्यांना यंत्रणेने त्रास देऊ नये, योग्य तपासणी करून संदर्भसेवेसाठी त्यांना परवानगी द्यावी. तसेच जिल्ह्यातील कोणते रुग्णालय शासकीय पॅनलवर आहे, त्याबाबत जनजागृती करावी, असे आमदार देवराव भोंगळे म्हणाले. अनेक दुर्धर आजारांचाही एकत्रित आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश करावा. जिल्ह्यात मिशन मोडवर आयुष्मान गोल्डन कार्ड काढण्याची मोहीम राबवावी आणि रुग्णवाहिकेची संख्या वाढवावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
ही आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील पॅनलवरील रुग्णालये : चंद्रपूर जिल्ह्यात आयुष्मान भारत प्रधानमंत्री व महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत एकूण 23 रुग्णालय अंगीकृत असून यात 15 शासकीय रुग्णालय तर 8 खाजगी रुग्णालय आहेत. शासकीय रुग्णालयांमध्ये चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय, चिमूर, मूल, राजुरा आणि वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालय तसेच बल्लारपूर, भद्रावती, गोंडपिपरी, गडचांदूर, कोरपना, नागभीड, पोंभुर्णा, सावली, सिंदेवाही आणि ब्रम्हपुरी येथील ग्रामीण रुग्णालयांचा समावेश आहे. तर खाजगी रुग्णालयांमध्ये चंद्रपूर येथील कोल सिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, क्रीस्ट हॉस्पीटल, गाडेगोणे आर्थोपेडीक हॉस्पिटल, मानवटकर हॉस्पीटल, मुसळे हॉस्पीटल, वासाडे हॉस्पीटल, चिमूर येथील श्रीहरी नेत्रालय आणि ब्रम्हपुरी येथील यशलोक हास्पीटल यांचा समावेश आहे.

