prabodhini news logo
Home गडचिरोली पाण्यात अडकलेल्या दोन बस सुखरूप बाहेर; प्रवाशांचे जिल्हा प्रशासनाचे आभार

पाण्यात अडकलेल्या दोन बस सुखरूप बाहेर; प्रवाशांचे जिल्हा प्रशासनाचे आभार

0
142

जिल्हा प्रशासनाच्या तत्काळ मदतीवर प्रवाशांच्या प्रतिक्रिया

गडचिरोली – दि. ९ जुलै: मुसळधार पावसामुळे गडचिरोली नागपूर महामार्गावर काल रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी बस अडकून पडल्या होत्या. जिल्हा प्रशासनाने तात्काळ जेसीबी आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीने दोन्ही बस बाहेर काढल्या. जिल्हा प्रशासनाच्या तत्पर आणि प्रभावी मदतीमुळे दोन्ही बसमधील सर्व प्रवासी सुखरूप बचावले असून, या तात्काळ प्रतिसादावर प्रवाशांनी समाधान व्यक्त करत जिल्हा प्रशासनाचे आभार व खुल्या मनाने कौतुक करून ‘महाराष्ट्र शासन जिंदाबाद’ चे नारे दिले.
गडचिरोली–आरमोरी मार्गावरील ठाणेगाव येथे एक खाजगी बस तसेच गाढवी नदीजवळ पुलाच्या अलीकडे एस.टी. महामंडळाची एक बस पाण्यातून जाताना इंजिन बंद पडल्याने जागेवरच सुमारे ३ फुट खोल पाण्यात अडकली होती. या बसमध्ये ५० आणि २३ प्रवासी प्रवास करत होते. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने तत्काळ जेसीबी व हायवा घटनास्थळी पाठवून बचावकार्य सुरू केले.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनात आरमोरीच्या तहसीलदार उषा चौधरी, पोलीस निरीक्षक कैलास गवते, गटविकास अधिकारी मंगेश आरेवार यांच्यासह आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम व स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही बसचे बचाव कार्य पार पाडण्यात आले.
या दोन्ही घटनांमध्ये प्रवाशांना कोणतीही इजा झालेली नसून, प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करत दोन्ही बस सुरक्षित बाहेर काढल्या. प्रवाशांना जिल्हा प्रशासनातर्फे तात्पुरत्या निवासाची आणि जेवणाची व्यवस्था ठाणेगाव ग्रामपंचायत मध्ये करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here