prabodhini news logo
Home चंद्रपूर भजन हे श्रद्धा, अध्यात्म आणि एकात्मतेचे प्रेरणादायी माध्यम

भजन हे श्रद्धा, अध्यात्म आणि एकात्मतेचे प्रेरणादायी माध्यम

0
115

आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

चंद्रपूर ग्रामीणमधील 30 भजन मंडळांना साहित्याचे वाटप

चंद्रपूर, दि.15 : भजन हे केवळ भक्तिगीत नसून ते समाजात श्रद्धा, एकात्मता व अध्यात्म जागविणारे, समाजाच्या एकतेचे प्रेरणादायी माध्यम आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. चंद्रपूर तालुक्यातील भजन साहित्य वाटपाचा कार्यक्रम तुकुम येथील अय्यप्पा मंदिर सभागृहात पार पडला. त्यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार बोलत होते.

विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत त्यांनी चंद्रपूर ग्रामीणमधील 30 भजन मंडळांना साहित्याचे वाटप केले. कार्यक्रमाची सुरुवात आ. मुनगंटीवार यांनी स्वतः ‘केशवा माधवा… तुझ्या नामात रे गोडवा’ हे भजन गाऊन केली. आयोजकांच्या आग्रहावरून त्यांनी भजन सादर केले.

कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, भाजपा नेते रामपाल सिंग, श्रीनिवास जंगमवार,नामदेव आसुटकर, मनोज मानकर, शांताराम चौखे, फारुख शेख,गौतम निमगडे, चंद्रकांत धोडरे, देवानंद थोरात, रूद्रनारायण तिवारी,नागेश कडूकर,अनिता भोयर, रोशनी खान, केमाताई रायपुरे, वनिता आसुटकर, गीता वैद्य, गीता सिंग, अरविंद बोरकर,अमोल जगताप,अतूल पिल्लरवार,मुक्ता येरगुडे, सुरेखा थोरात, मोनी आसवानी, रंजना किन्नाके, दयानंद बंकुवाले, शंकर खत्री,घनश्याम यादव आदींची उपस्थिती होती.

आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘भजनामुळे धार्मिक व अध्यात्मिक भावनेने वातावरण भारावून जाते. भजनाला अध्यात्म्याची किनार असून ते प्रत्येक संकटावर मात करण्याची प्रेरणादायी ऊर्जा आहे. समाजात श्रद्धा, एकात्मता व अध्यात्म जागविण्याचे सामर्थ्य भजनामध्ये दडलेले आहे. हाच भक्तिभाव जोपासण्यासाठी भजन मंडळांना आवश्यक साहित्य समर्पित करीत आहे.’ भजन मंडळांना मिळालेल्या या साहित्यामुळे भक्ती सेवेला नवी ऊर्जा व प्रेरणा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मतदारसंघातील विकासकामांसह धार्मिक-सांस्कृतिक क्षेत्रात अभिमानास्पद कार्य:

आमदार सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, मतदारसंघात अनेक विकासात्मक कामे केली आणि पुढेही करत राहील. छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला. तसेच भजन मंडळांना सभागृहासाठी 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला. अयोध्येच्या राम मंदिरात काष्ठ पाठविण्याचे सौभाग्य मिळाले, याचा मला अभिमान आहे.’ संसद भवनाचे दरवाजे तसेच पंतप्रधानांच्या कार्यालयातील खुर्ची ही आपल्या मतदारसंघातील बल्लारपूरच्या लाकडापासून तयार झाली आहे, ही गौरवाची बाब आहे. भीमाशंकर येथे ज्येष्ठ नागरिकांना थेट मंदिरात जाण्याची व्यवस्था तसेच महादेव वन परिसरात सोयी-सुविधा निर्माण करण्याचे तसेच कोराडी येथे 200 कोटी रुपये खर्च करून आई जगदंबा मंदिराचे भव्य बांधकाम आणि पंढरपूर येथे तुळशी वृंदावन उभारण्याचे भाग्य लाभले असल्याचेही ते म्हणाले.

याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लंडनहून भारतात आणण्याचा मान, नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे आणि अमरावती विद्यापीठाला वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबांचे नाव देण्याचे सौभाग्य लाभले.याशिवाय मोझरीच्या विश्वस्त मंडळावर आजीवन ट्रस्टी आणि उपाध्यक्ष म्हणून कार्य करण्याची संधी ही माझ्यासाठी आयुष्यातील अमूल्य ठेवा असल्याचे आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here