prabodhini news logo
Home ठळक बातम्या प्रत्येक विभागाने कार्यक्षेत्रातील उद्दिष्टांवर नियमित पुनरावलोकन करावे – जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

प्रत्येक विभागाने कार्यक्षेत्रातील उद्दिष्टांवर नियमित पुनरावलोकन करावे – जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

0
95

निती आयोगाच्या आकांक्षीत जिल्हा योजनेंतर्गत आढावा बैठक

वाशिम – दि. १३ नोव्हेंबर (जिमाका) निती आयोगाने ठरवून दिलेल्या सूचकांनुसार सर्व विभागांनी आपल्या कार्यक्षेत्रातील प्रगतीचे सातत्याने पुनरावलोकन करावे. संबंधित सूचकांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. आकडेवारीवर आधारित नियोजन, वेळेत कामकाजाची पूर्तता आणि परस्पर समन्वय या माध्यमातून कार्यक्षमता वाढवावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
आकांक्षीत जिल्हा वाशिमच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी केंद्र शासनाच्या निती आयोगामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध विभागांचा इंडिकेटरनिहाय सविस्तर आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक पार पडली.
बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी संजय राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. ठोंबरे, शिक्षणाधिकारी संजय ससाणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शाहा, कृषी उपसंचालक हिना शेख, महिला व बालकल्याण कार्यक्रम अधिकारी संजय गणवीर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त प्रविण खंडारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे, जिल्हा प्रकल्प सहयोगी निलिमा भोंगाडे, सीएम फेलो संकेत नरोटे आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत शिक्षण, आरोग्य, कृषी, कौशल्य विकास, महिला व बालकल्याण, पोषण, उद्योग, पशुसंवर्धन, सांख्यिकी, ग्रामीण विकास व रोजगार या घटकांचा विभागनिहाय प्रगती अहवाल सादर करण्यात आला. सादर झालेल्या आकडेवारीच्या आधारे जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी कामकाजाचे परीक्षण करून आवश्यक सूचना दिल्या.
जिल्हाधिकारी श्री.कुंभेजकर पुढे बोलतांना म्हणाले की, निती आयोगाच्या उद्दिष्टांनुसार जिल्ह्याचा विकास निर्देशांक उंचावणे हे सर्व विभागांचे सामूहिक ध्येय असले पाहिजे. प्रगतीविषयक माहिती वास्तव आकडेवारीवर आधारित असावी. उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करून ठरविलेल्या कृती आराखड्यानुसार कामकाज पार पाडावे.
बैठकीदरम्यान आरोग्य सूचकांमध्ये सुधारणा, शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ, पोषणस्तर उंचाविणे, कौशल्य विकास प्रशिक्षणांचा विस्तार व उपक्रम या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here