
निलंगा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – “नगर परिषद निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून येणे ही काळाची गरज आहे. रस्ते, नाले, उद्याने यांसारख्या मूलभूत नागरी सुविधांसाठी येणारा विकासनिधी पारदर्शकपणे खर्च व्हावा, यासाठी वंचित बहुजन आघाडीच सक्षम पर्याय आहे,” असे प्रतिपादन पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजली आंबेडकर यांनी केले.
निलंगा नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या भव्य जाहीर सभेत त्या बोलत होत्या. यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.
विकासासाठी सक्षम पर्यायाची गरज-
सभेला संबोधित करताना प्रा. अंजली आंबेडकर यांनी स्थानिक प्रश्नांवर भाष्य केले. त्या म्हणाल्या की, नगर परिषदेचा निधी हा जनतेच्या हक्काचा पैसा आहे. हा पैसा योग्य कामांसाठीच वापरला जावा याची खात्री देण्यासाठी सुशिक्षित आणि प्रामाणिक लोकप्रतिनिधी सभागृहात असणे आवश्यक आहे. निलंग्याचा कायापालट करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने या निवडणुकीत कंबर कसली असल्याचे त्यांनी सांगितले.
उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन
या सभेत प्रा. अंजली आंबेडकर यांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मुजीब सौदागर यांच्यासह नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवत असलेल्या सर्व उमेदवारांच्या नावांचा उल्लेख करत त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. या भव्य जाहीर सभेत मंजुषा निंबाळकर, पुष्पा कांबळे, हिरालाल निंबाळकर, विशाखा हातगळे, अरबाज शेख, इस्माईल कुरेशी आणि इतर पुरस्कृत उमेदवारांचा समावेश आहे.
या जाहीर सभेला निलंगा शहरातील नागरिक आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेतील उत्साहामुळे आगामी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी निलंग्यात जोरदार टक्कर देणार असल्याचे चित्र दिसून आले.















