
वेलमागड, जवेली खु इतर गावाबाबत कोणतीही जनसुनावणी नको!
एटापल्ली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – एटापल्ली तालुक्यातील प्रस्तावित वेलमागड खाण सर्वेक्षणाच्या मुद्द्यावरून प्रशासन व स्थानिक आदिवासी जनतेतील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. जल–जंगल–जमीन आणि आदिवासी अस्तित्वावर घाला घालणाऱ्या या खाणप्रकल्पाविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) ठामपणे जनतेच्या पाठीशी उभा आहे. बंद दाराआड किंवा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत कोणतीही जनसुनावणी मान्य नाही; सर्व अशी स्पष्ट भूमिका भाकपने घेतली आहे.
आधीच्या निवेदनांकडे दुर्लक्ष का?
भाकपचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र टीका केली. ते म्हणाले,
“खाणप्रकल्पामुळे होणारे पर्यावरणीय नुकसान, वनजमिनीचा ऱ्हास आणि आदिवासींच्या उपजीविकेवर होणारा आघात याबाबत आम्ही यापूर्वीही ग्रामस्थचा लेखी निवेदने दिली आहेत. तरीही प्रशासन वारंवार सर्वेक्षणाचा घाट घालत आहे. लोकांना अंधारात ठेवून निर्णय घेणे म्हणजे लोकशाहीची थट्टा आहे.”
भाकपच्या ठाम मागण्या:
* जनसुनावणी घेऊ नये :
* ग्रामसभेचा सन्मान: ‘ओमसाईराम स्टील्स’ कंपनीला कोणतीही परवानगी देऊ नये
* दडपशाही थांबवा: बळाचा वापर, दबावतंत्र किंवा मोजक्या प्रतिनिधींशी गुप्त चर्चा तात्काळ थांबवावी.
प्रशासकीय बैठकीवर ग्रामस्थांचा बहिष्कार
सोमवारी उपविभागीय अधिकाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकीत सर्व ग्रामस्थांना प्रवेश नाकारण्यात आला. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला.
“आमच्या जमिनीचा, जंगलाचा आणि भविष्याचा निर्णय होत असताना आम्हालाच बाहेर ठेवले जाते, हा सरळ अन्याय आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली. या बहिष्कार आंदोलनाला भाकपने जाहीर पाठिंबा दिला.
#संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशारा
भाकपने स्पष्ट इशारा दिला आहे की, प्रशासनाने जनतेच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून जबरदस्तीने सर्वेक्षण किंवा खाणकाम पुढे नेण्याचा प्रयत्न केल्यास संपूर्ण जिल्ह्यात तीव्र जनआंदोलन छेडले जाईल.
६४० हेक्टर वनजमीन वाचवण्यासाठी, आदिवासींचे हक्क आणि अस्तित्व टिकवण्यासाठी हा लढा शेवटपर्यंत लढला जाईल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.















