
पुणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि लोकप्रिय लोकनेते अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या एका दुर्दैवी विमान अपघातात निधन झाले आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
या दुर्दैवी घटनेनंतर राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात आज शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. तसेच, पुढील तीन दिवस राजकीय दुखवटा पाळला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, “संपूर्ण पवार कुटुंब बारामतीला पोहोचल्यानंतर त्यांच्या संमतीने अंत्यसंस्कार आणि पुढील विधींबाबतचे निर्णय घेतले जातील.”
ही घटना राज्यासाठी कधीही भरून न निघणारे नुकसान असल्याचे बोलले जात आहे. “एक झुंजार लोकनेते आपल्यातून निघून गेल्यामुळे जी पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून काढणे अशक्य आहे. संघर्षाच्या काळात आम्ही एकत्र काम केले असून, या भीषण वास्तवावर विश्वास ठेवणे कठीण होत आहे,” अशा शब्दांत त्यांच्या निकटवर्तीयांनी भावना व्यक्त केल्या आहेत.















