
चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर शहरात ‘पेट्रोल संपणार’ अशी जोरदार अफवा पसरल्याने आज नागरिकांनी पेट्रोल पंपांवर तुफान गर्दी केली. सकाळपासूनच शहरातील सर्वच पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. मात्र, जिल्हा प्रशासनाने या अफवांचे खंडन केले असून जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे.
अफवांनी उडाली धांदल
आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठा खंडित होईल, अशा चर्चांनी सोशल मीडिया आणि शहरात जोर धरला. यामुळे घाबरलेल्या वाहनधारकांनी पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी पंपांवर एकच गर्दी केली. अनेक ठिकाणी रांगा रस्त्यापर्यंत आल्याने वाहतुकीची कोंडी देखील निर्माण झाली होती.
जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे आवाहन
या परिस्थितीची दखल घेत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. “जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलची कोणतीही टंचाई नाही. प्रशासनाकडे इंधनाचा साठा पुरेसा आहे. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असून पुरवठा साखळी विस्कळीत झालेली नाही. नागरिकांनी कोणत्याही चुकीच्या माहितीवर किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
विनाकारण गर्दी टाळा
प्रशासनाने पुढे कळविले आहे की, इंधनाचा साठा मुबलक असल्याने नागरिकांनी साठेबाजी करू नये किंवा पेट्रोल पंपांवर विनाकारण गर्दी करून गोंधळ निर्माण करू नये. अफवा पसरवणाऱ्यांवर लक्ष ठेवले जात असून, नागरिकांनी संयम बाळगावा असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.















