
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगल परिसरात आज सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. तेंदूपाने तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या १३ महिलांवर अचानक वाघाने हल्ला चढविल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भीषण हल्ल्यात चार महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून काही महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुंजेवाही गावातील महिला नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास तेंदूपाने संकलनासाठी जंगलात गेल्या होत्या. दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केल्याने महिलांमध्ये एकच गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी महिलांनी आरडाओरड करत जंगलातून पळ काढला. मात्र वाघाच्या हल्ल्यात चार महिलांना आपला जीव गमवावा लागला.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, पोलीस प्रशासन व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. जखमी महिलांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. परिसरात भीतीचे वातावरण असून नागरिकांनी जंगलात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, वारंवार होणाऱ्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून वनविभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.















