
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर आता गावगाड्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. यामुळे पारा-पारावर,चौकात निवडणुकीची चर्चा रंगत असून महायुती व महाविकास आघाडीचे जागा वाटप कसे होणार?, उमेदवार कोण असणार?, बंडखोरी होणार का?, असे अनेक प्रश्न असल्याने सर्वसामान्यांच्या चर्चेत रंगू लागले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी नक्की कुणाला मिळणार, याची चिंता राजकीय पक्षांऐवजी खांद्यावर दुपट्टा टाकून असलेल्या कार्यकर्त्यांनाच जास्त लागून असल्याची चित्र आहे. निवडणुकीच्या आखाड्यात आता नव्याने रंग भरणार असून उमेदवार निश्चितीनंतर ‘आर या पार’ पवित्रा घेऊन एकमेकांची जिरवाजिरवी होणार असली तरी कार्यकर्त्यांची राजकीय धुळवड सध्या गांवगाड्यात सुरू झाली आहे. ही निवडणूक अगदी रंगात येणार असून कोणत्या मतदारसंघातून यावेळी कोण बाजी मारतो, याचे आडाखे बांधले जाणार आहेत.सोशल मीडियावरही निवडणूक अधिकाऱ्यांची करडी नजर राहणार नेतेमंडळींनाच नव्हे तर कार्यकर्ते व नेटकऱ्यांनाही आता भान ठेवावे लागणार आहे.
चौकाचौकात निवडणुकीचीच चर्चा
या लोकसभा निवडणुकीत बदललेली राजकीय समीकरणे, आरोप-प्रत्यारोपांमुळे ग्रामीण भागातील वातावरण उमेदवार जाहीर होण्याच्या अगोदरच ढवळून निघाले आहे. निवडणूक ज्वर आता गावोगावी पाहावयाला मिळत आहे.














