धानाची उचल न झाल्याने उन्हाळी धान खरेदीवर परिणाम होण्याची शक्यता

0
90

धान खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करण्याची न.प.माजी सभापती विलास विखार यांची मागणी

रविंद्र मैंद
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी

शेतकऱ्यांच्या धानाला योग्य मोबदला मिळावा, हमीभावापेक्षा कमी दर मिळु नये म्हणून केंद्रशासनाच्या वतीने आधारभूत किंमत योजनेअंतर्गत जिल्हा पणन महासंघ कार्यालयाच्या वतीने शासकीय धान खरेदी केली जाते. आता सध्या उन्हाळी धानपिक कापणीचे झाले असुन सदर धान विकण्यासाठी शेतकऱ्यांना आधारभुत धान खरेदी केंद्र उपलब्ध न झाल्यास परिणामी आपला धान खाजगी व्यापाऱ्यांना विकावा लागणार आहे.

मागील खरीप हंगामात चंद्रपूर जिल्ह्यात शासकीय आधारभूत किंमत योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात ४८ धान खरेदी केंद्रांच्या माध्यमातून ५ लाख क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. त्यामुळे सब एजंट म्हणून ज्या संस्थांनी ही खरेदी केली त्या संस्थांचे गोदाम धान साठ्याने भरले आहेत. नोव्हेंबर २०२३ पासून खरीप हंगामात धान खरेदी करण्यात आली होती. तेव्हा पासून ६ महीन्यांचा कालावधी लोटत असतांना देखील राईस मिलर्सच्या मागण्यांवर शासनाने तोडगा न काढल्याने धानाची उचल झाली नाही. त्यामुळे गोदामांमध्ये असलेला धान्यसाठा कायम आहे.

आता उन्हाळ्यात नवीन धान खरेदी केल्यानंतर हा धान्यसाठा कुठे ठेवायचा हा गंभीर प्रश्न धान खरेदी करणाऱ्या संस्थांना पडला आहे.
परिणामी ह्या संस्थांच्या गोदामातील धान्य साठ्याची उचल न झाल्यास ते नवीन धान खरेदी करणार नाही. याचा सर्वात मोठा फटका धान उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. नाईलाजास्तव कमी दराने त्यांना खाजगी व्यापाऱ्यांना आपल्या धानाची विक्री करावी लागणार आहे. त्यामुळे त्यांचा फार मोठा नुकसान होणार आहे.

मागील हंगामात खरेदी केलेला धान्यसाठा शासनाने लवकरात लवकर उचलून गोदाम रिकामे करून द्यावे. तेव्हाच उन्हाळी धान खरेदी करतांना धान खरेदी संस्थांना सोईचे होईल. परिणामी शेतकऱ्यांना आपल्या धानाची विक्री आधारभूत धान खरेदी केंद्रावर करता येईल. यामुळे खाजगी व्यापाऱ्यांना कमी किंमतीत आपले धान शेतकऱ्यांना विकावे लागणार नाही. – विलास विखार माजी सभापती न.प.ब्रम्हपुरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here