“महाराष्ट्राचे उत्कृष्ट कवी” ठरले मा. कवी – महादेव भोकरे, वडूज सातारा, तर “महाराष्ट्राची उत्कृष्ट कवयित्री” ठरल्या मा. कवयित्री- अल्का फुलझेले, नागपूर
सोलापूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – भारतीय समाजातील अज्ञान बघून अनेक समाजसुधारक समोर सरसावले. लेखनाद्वारे, भाषणाद्वारे, भजन, कीर्तन, प्रवचन, नृत्य, कविता, गीते, नाटक, इत्यादीच्या माध्यमातून त्यांनी समाजाचे प्रबोधन केले. आताच्या आधुनिक युगात देखील अनेक चुकीच्या घटना घडतांना दिसतात. त्यासाठी आजच्या घडीला देखील सामाजिक प्रबोधनाची गरज आहे. असाच एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न “सम्यक दर्शन साहित्य राज्यस्तरीय मंचाचा” आहे.
या अनुषंगाने “सम्यक दर्शन साहित्य राज्यस्तरीय मंच” यांचे तर्फे आठवडी काव्यलेखन स्पर्धा क्र.६ दि. ४ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर २०२४ या दरम्यान घेण्यात आली होती. या स्पर्धेचा विषय होता, “मी भिडे वाडा बोलतोय” या विषयावर झालेल्या काव्यलेखन स्पर्धेत महाराष्ट्रातील कवी आणि कवयित्रींनी सहभाग घेतला होता. या काव्यलेखन स्पर्धेत यावेळी
“महाराष्ट्राचा उत्कृष्ट कवी” हा सन्मान महादेव भोकरे, वडूज यांना मिळाला आहे. कवी हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनियर काॅलेज, वडूज ता. खटाव जि. सातारा येथे मराठी विषयाचे अध्यापन करतात. त्यांचे परिवर्तन वादी चळवळी, शिक्षक संघटना, साहित्य संमेलने यांतील जिल्हा/विभागीय विविध पदांवरून सामाजिक, शैक्षणिक कार्य सुरू आहे. अनेक मंचावरून व्याखाने अविरत सुरु असून विविध माध्यमातून चारोळ्या, कविता, गझला प्रकाशित झाल्या आहेत. त्यांना अनेक सन्मान व पुरस्कार प्राप्त आहेत. महामानवांच्या जीवनचरित्रावर, ग्रंथांवर, इतर विषयांवर झालेल्या स्पर्धेत दोनशेहून अधिक सन्मानपत्र प्राप्त आहेत.
या स्पर्धेत *”महाराष्ट्राची उत्कृष्ट कवयित्री ” चा सन्मान मिळाला आहे कवयित्री अल्का फुलझेले, नागपूर* यांना. कवयित्री जिल्हा परिषद शिक्षिका असून त्यांना नुकताच आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. आंबेडकरवादी कवितेतील जागतिकीकरण या विषयावर गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे पी. एच. डी सुरू आहे. ‘आभास’ व ‘वाट आनंदाची’ हे काव्यसंग्रह प्रकाशित झालेले असून विविध समूहात लेखन सुरू आहे.
दोन्ही कवींचे समूहाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व भविष्यकालीन वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
सामाजिक प्रबोधनाच्या हेतूने या आँनलाईन साहित्य समूहाची निर्मिती करण्यात आली आहे. या समूहाचे संस्थापक मा. देविदास गायकवाड तसेच सौ.सुनिता तागवान. हे असून वैशाली सुर्यवंशी व सुजाता उके ह्या प्रशासिका आहेत.
प्रत्येक आठवड्यात एक स्पर्धा घेतली जाईल. प्रत्येक आठवड्यात एक कवी व एक कवयित्री यांना हा सन्मान दिला जाणार आहे. तेव्हा पुढील स्पर्धांमध्ये साहित्यिकांनी सातत्याने सहभागी होत रहावे असे आवाहन समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.

