प्रणित तोडे चंद्रपूर प्रतिनिधी – चंद्रपूर येथील सामाजिक कार्यकर्ते नकुल कांबळे यांनी चंद्रपूर जिल्हाधिकारी विनयजी गौडा यांची भेट घेत चैत्र महिन्यात सुरू होणाऱ्या महाकाली यात्रेतील विविध समस्या तसेच महाकाली मंदिर परिसरातील सुरक्षा आणि सुविधा यासंबंधी निवेदन दिले.
महाकाली यात्रेतील सुरक्षेच्या उपाययोजना आवश्यक
दरवर्षी महाकाली यात्रेला मोठ्या प्रमाणावर भाविक दाखल होतात. मात्र, यात्रेच्या कालावधीत भाविकांची होणारी गैरसोय, मंदिर परिसरातील स्वच्छता, गर्दी व्यवस्थापन आणि सुरक्षेच्या उपाययोजना यावर विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे नकुल कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच मराठवाडा आणि विदर्भातून येणाऱ्या भाविकांचे सामान चोरीला जाण्याच्या घटनाही रोखण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
चंद्रपूर शहरातील वाढती गुन्हेगारी आणि अमली पदार्थ विक्रीवर चिंता
नकुल कांबळे यांनी चंद्रपूर शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारी घटनांबाबतही जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. मागील काही दिवसांपासून अमली पदार्थांची विक्री, नकली दारूचा गैरव्यवहार, तसेच देशी कट्टे आणि जिवंत काडतुसे शहरात आढळून येत आहेत.
मागील दोन दिवसांत दारूबंदी कायद्यांतर्गत चंद्रपूर पोलिसांनी ५७ गुन्ह्यांची नोंद केली आहे. त्यामुळे शहरातील सुरक्षेच्या उपाययोजना अधिक प्रभावी करण्याची मागणी करण्यात आली.
महाकाली यात्रेतील पोलीस बंदोबस्त वाढवण्याची मागणी
महाकाली यात्रेच्या कालावधीत पोलीस विभागाने अधिक दक्ष राहावे आणि यात्रेतील सुरक्षेवर विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
ही भेट महाकाली मंदिर परिसरातील सामाजिक समस्यांवर अधिकृत पातळीवर कार्यवाही होण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते.

