
विवेक मिरालवार तालुका प्रतिनिधी अहेरी 8830554583 – जिमलगट्टा : आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. पावसामुळे मोठ्या प्रमाणात चिखल झाला असून महामार्ग की चिखलमार्ग, असा प्रश्न येथून प्रवास करणाऱ्यांना पडतो. दुचाकीस्वार, कारचालकांना याचा जबर फटका बसत असून, जड वाहने फसण्याचा धोका निर्माण झाला आहे.
आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाची (३५३ सी) मागील तीन वर्षापासून दयनीय स्थिती आहे. चिखलात वाहन फसल्यास जंगलात प्रवाशांना रात्री-अपरात्री अडकून राहावे लागू शकते. त्यामुळे या महामार्गाचे काम दर्जेदार कधी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पावसाळ्यापासून गडचिरोली- सिरोंचा बस बंद
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे मागील दोन वर्षांपासून चंद्रपूर-नागपूर येथील बसफेऱ्या बंद आहेत. गडचिरोलीवरून सिरोंचासाठी एक बस सुरू झाली होती, पण तीदेखील बंद करण्यात आली आहे. त्यामुळे दळणवळणासाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. सध्या निर्माणाधीन मार्गालगत गुडघ्याएवढा चिखल साचला असून, त्यातून वाहने काढताना वाहनचालकांचा कस लागत आहे. दुचाकी व कार या चिखलातून नेणे अशक्यप्राय बनत आहे. जड वाहने येथून मोठ्या प्रमाणात धावतात, पण ती देखील चिखलात फसण्याचा धोका आहे. एखादे वाहन चिखलात फसल्यास संपूर्ण रहदारी प्रभावित होते.















