
18 सप्टेंबर रोजी ग्रामवासी आणि शेतकरी वर्गाचा लढा!
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – भद्रावती तालुक्यातील नंदोरी ग्रामपंचायत अंतर्गत इंदिरानगर परिसरातील नागरिकांना पुलाच्या अभावामुळे प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. २०१८ साली चांदा ते बांदा योजनेत पुलाचे काम सुरू झाले, मात्र भ्रष्टाचारामुळे ते आजतागायत अपूर्ण राहिले. परिणामी नागरिकांचा संताप शिगेला पोहोचला असून आता या प्रश्नावर थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दिनांक 18/09/2025 रोजी गुरुवार ला सकाळी 9:00 वाजल्यापासून नंदोरी येथून भद्रावती तहसील कार्यालयापर्यंत भव्य पायदळ यात्रा आयोजित करण्यात येणार आहे.
या यात्रेच्या शेवटी तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात येणार आहे.
या यात्रेदरम्यान –
1. नंदोरी ग्रामवासी आणि समस्त शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत,
2. यात्रेदरम्यान जोरदार नारेबाजी केली जाणार आहे,
3. तसेच बैल-बंडी, ट्रॅक्टर व ट्रॉलीसह ग्रामस्थ या आंदोलनात सामील होणार आहेत.
गावकऱ्यांच्या प्रमुख मागण्या :
१. २०१८ साली सुरू झालेले पण अपुरे राहिलेले पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे.
२. संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी.
३. ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात.
हे आंदोलन सुरज भाऊ शाहा यांच्या नेतृत्वात व सुमित हस्तक यांच्या मार्गदर्शनात पार पडणार असून, ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की – १५ दिवसांच्या आत मागण्यांची पूर्तता झाली नाही, तर तीव्र आंदोलन उभारले जाईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील.















