
शारदा भुयार वाशिम जिल्हा प्रतिनिधी – वाशीम : कारंजा येथील महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक तथा ज्येष्ठ पत्रकार संजय मधुकरराव कडोळे हे त्यांची परिस्थिती बेताची असतांनाही ते त्यांच्या मिळकती (उत्पन्ना) मधून,समाजातील दुःखी-कष्टी-निराधार वयोवृद्धांसाठी वेगळा वाटा काढून,सभोवतालच्या दुःखी वयोवृद्धांच्या डोळ्यातील अश्रू पुसून त्यांना मायेचा आसरा देण्यासाठी ‘फुल नाही तर फुलाची पाकळी’ म्हणून त्यांना दरवर्षी मदत करून दिवाळीचा आनंद साजरा करीत असतात.त्यामुळे यंदाही त्यांनी गॅस दुर्घटनेत स्वतःची कर्ती सवरती दोन मुले-सुनबाई-मुलगी व नातवंड असा संपूर्ण हसता खेळता परिवार गमविल्याने दु:खी कष्टी निराधार झालेल्या, सोमठाना येथील मधुकरराव गावंडे पाटील काका यांची शेला टोपी व सौ.काकू यांना नऊवार पातळ व मिठाई देवून तसेच अनई येथील वयोवृद्धा श्रीमती कांताबाई भागवत यांना नऊवार पातळ देवून व मिठाई देवून त्यांची दिवाळी गोड करून खारीचा वाटा उचलला आहे. यावेळी त्यांचे सहकारी कैलास सुरेश हांडे सोबत होते. उल्लेखनिय म्हणजे संजय मधुकरराव कडोळे हे नेहमीच सभोवतालच्या समाजातील दुःखी,दारिद्री, दिव्यांग,वयोवृद्ध,निराधार व अनाथ व्यक्तींसाठी हळव्या मनाचे असून त्यांच्या सेवेत कार्यरत राहून त्यांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न करीत असतात.कोणताही जातीभेद,धर्मभेद न बाळगता त्यांनी आजतागायत शेकडो गरजू निराधार व्यक्तींना संजय गांधी अनुदान योजना,श्रावण बाळ वृद्धापकाळ योजना,राजर्षी शाहू महाराज वद्ध साहित्यीक कलाकार योजनेचा लाभ मिळवून देऊन त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय करून दिली आहे.त्यामध्ये त्यांनी जास्तित जास्त गरजवंताना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला हे विशेष.त्यांनी तनमनधनाने केलेल्या प्रयत्नरूपी मदतीने वन्य प्राणी रोही प्राण्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या स्व.सुदाम लोखंडे दिघी यांच्या विधवा पत्नी,कांता लोखंडे,ब्रम्हचारी असलेले दिव्यांग अजाब ढळे,दारिद्रयावस्थेत असणाऱ्या इंदिरा मात्रे,भामदेवीतील सैतवाळ जैन समाजाचे राजेंद्र डोळस, दिव्यांग शेषराव इंगोले, मनोरुग्न सुरेश हांडे,मुस्लीम फकीर समाजाची इम्तियाजबी अजीजशहा,गवळी समाजाची विधवा गंगूबाई रमजान, दिव्यांग हसन पटेल,दिव्यांग रमजान बेनीवाले इत्यादी शेकडो लोकांची आजीवन दोन वेळा पोटभर जेवणाची सोय झाली आहे. या सर्वांना दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी सांस्कृतिक कार्य संचलनालय किंवा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजना विभागाकडून आजीवन योजनेचा लाभ मिळवून दिला आहे.















