
शिवसेना शहर प्रमुख अरुण बिकड यांचा पुढाकार
शारदा भुयार वाशिम जिल्हा प्रतिनिधी – कारंजा लाड – शिवसेनेच्या धडाडीच्या नेत्या आमदार भावनाताई गवळी या तळागाळातील जनमानसांच्या समस्यांबाबत कमालीच्या जागृत असुन त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन कारंजातील शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी ही नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढे सरसावले असुन, प्रभाग क्र.१ मधील गौतम नगर आणि शांती नगर व परिसरातील नागरिकांनी कारंजा शहर शिवसेना प्रमुख अरुण बिकड यांची भेट घेऊन प्रभागातील समस्यांबाबत अवगत केले.
प्रभाग क्र. १ मधील १५ ते २० परिवार येत असलेल्या अवाजवी विजेच्या बीलाबाबत त्रस्त असुन आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने वीज बील कसे भरावे ? या विवंचनेत आहेत. तर दुसरीकडे बऱ्याच परिवाराचे, वीज मीटर घरातुन काढुन बाहेर पोलवर लावण्यात आले आहे. त्यापैकी काही मीटर पोलवरुन खाली तुटून लोंबकळत आहेत. महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ह्या समस्या सांगितल्यावर आश्वासन देण्यापलीकडे त्यांनी काहीही केले नाही. अशाप्रकारे महावितरण कंपनीकडून होत असलेल्या त्रासामुळे व अन्यायाबाबत तेथील ग्राहकांनी शहर शिवसेना प्रमुख अरुण बिकड यांना अवगत केले असता त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तत्काळ महावितरण कंपनीचे कारंजा येथील कार्यालयावर धडक देऊन, वाशिम येथील मुख्य कार्यकारी अभियंता चव्हाण साहेब व उप अभियंता राजपूत साहेब यांची भेट घेऊन नागरिकांच्या उपरोक्त समस्यांबाबत आक्रमकपणे बाजु मांडली. यावेळी वाशिम जिल्हा महिला आघाडी प्रमुख वैशालीताई येळणे , तालुका प्रमुख मंगेश पाटील मुंदे , विधानसभा समन्वयक राज पाटील चौधरी, दिलीप भोजराज व शहर संघटक ॲड. संदेश जिंतुरकर यांनीही चव्हाण साहेब यांच्याशी चर्चा करून यावर त्वरीत तोडगा काढण्याची जोरदार पणे मागणी केली. ह्याबाबत चौकशी करून एका आठवड्यात ह्या समस्यांबाबत अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करु असे आश्वासन चव्हाण साहेब यांनी दिले आहे.
यावेळी वाशिम जिल्हा महिला प्रमुख वैशालीताई येळणे, तालुका प्रमुख मंगेश पाटील मुंदे, दिलीप भोजराज, कारंजा मानोरा विधान सभा समन्वयक राज पाटील चौधरी, शहर प्रमुख अरुण बिकड, शहर संघटक ॲड. संदेश जिंतुरकर, तालुका संघटक अतुल दरेकर, युवा सेना प्रमुख शाम पावडे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख चैतन्य वक्ते, युवा सेना कारंजा मानोरा विधानसभा प्रमुख अजय मते, प्रफुल्ल गवई व शुभम भोयर आदी शिवसैनिक तसेच गौतम नगर येथील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
शिवसेनेच्या ह्या आक्रमक भुमिकेमुळे मात्र पिडीत ग्राहकांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.















