
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – आंबेगाव खुर्द येथे काल रात्री अकरा वाजता सीमा भिंत कोसळण्याची गंभीर घटना घडली असून मोठी जीवितहानी टळली. माळीम सारख्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ शकली असती, अशी भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. डोंगरमातेच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात घरे असल्याने चाकरमनी नागरिक धोक्यात राहत आहेत.
हा परिसर 2017 पासून PMC हद्दीत असूनही, कररूपाने लाखो रुपये गोळा केल्यानंतरही पुणे महानगरपालिका या भागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. नागरिक म्हणतात की, महापालिका कर घेण्यात तत्पर, पण सुविधा देण्यात कुचकामी.
सीमा भिंत बांधकामासाठी आम आदमी पार्टी, पुणे प्रशांत कांबळे शहराध्यक्ष सामाजिक न्याय विभाग प्रमुख यांनी दिनांक 17/02/2025 रोजी अधिकृत पत्र देऊन महापालिकेला सतर्क केले होते. मात्र, पालिकेच्या भ्रष्ट, ढिसाळ आणि बेपर्वा प्रशासनाने त्या पत्राकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे आजची दुर्घटना अनिवार्य झाली, असा आरोप आप, ने केला आहे.
महापालिकेच्या या निष्काळजीपणामुळे महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. लाईट ट्रान्सफॉर्मर, वायरींग व इतर साधनसामग्री पूर्णपणे खराब झाली आहेत.
याबाबत प्रशांत कांबळे यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.
एक रुपयात होणारे काम शंभर रुपयांत करण्याचा PMC चा कमीशन मॉडेल या भागात उघडपणे सुरू आहे. लोकांचे जीव धोक्यात घालून भ्रष्टाचार करणे हा महापालिकेचा हा प्रकार आहे.
दरड कोसळण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे PMCने दुर्लक्षित केलेली ड्रेनेज लाईन, सतत वाहणारे पाणी आणि त्यामुळे झालेला जमिनीचा खच. अनेक वाहनांचे नुकसानही झाले आहे.
आम आदमी पार्टीने आरोप केला आहे. PMC अधिकारी जाणीवपूर्वक पाहणी लांबवतात, जेणेकरून भ्रष्ट कामे ‘आपत्कालीन काम’ म्हणून महाग दरात दाखवता येतील.
नागरिकांच्या तक्रारी, पत्रे आणि पावत्या उपलब्ध असतानाही महापालिका डोळे झाकून बसली आहे.
एखादी दुर्घटना घडल्यावर फोटोसेशनसाठी पाहणी केली जाते, पण पाहणीचे रूपांतर कामात कधीच होत नाही.
या परिसरातील लोकांना नैसर्गिक आपत्तीपेक्षा PMC च्या भ्रष्टाचाराचा जास्त धोका आहे.
तातडीने सीमा भिंत, ड्रेनेज दुरुस्ती आणि ढासळणाऱ्या भागाची शास्त्रोक्त तपासणी करण्यात यावी. अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.















