prabodhini news logo
Home चंद्रपूर भारतीय परंपरेतील ज्ञानसंपदेचा अभिमान बाळगून कला, संस्कार आणि राष्ट्रभावना यांचा सेतू अधिक...

भारतीय परंपरेतील ज्ञानसंपदेचा अभिमान बाळगून कला, संस्कार आणि राष्ट्रभावना यांचा सेतू अधिक बळकट करा : डॉ. रमा गोळवलकर

0
62

संस्कार भारती चंद्रपूर तर्फे भारतमाता पूजन आणि महर्षी भरतमुनी जयंती उत्साहात साजरी

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – “भारतमाता ही केवळ भौगोलिक सीमांची प्रतिमा नाही, तर ती आपल्या संस्कृतीची, संस्कारांची आणि अखंड राष्ट्रचैतन्याची साक्षात मूर्ती आहे. महर्षी भरतमुनींनी ‘नाट्यशास्त्राच्या माध्यमातून भारतीय जीवनमूल्यांना कला आणि अभिव्यक्तीची दिशा दिली. आजच्या पिढीने भारतीय परंपरेतील या ज्ञानसंपदेचा अभिमान बाळगून कला, संस्कार आणि राष्ट्रभावना यांचा सेतू अधिक बळकट केला पाहिजे,” असे प्रतिपादन जनसंवाद विद्या विभाग आणि इतिहास क्षेत्रातील तज्ञ डॉ रमा गोळवलकर यांनी केले.
11 फेब्रुवारी रोजी संस्कार भारती चंद्रपूर तर्फे डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय चंद्रपूर येथे भारतमाता पूजन आणि महर्षी भरतमुनी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी या नात्याने पत्रकार ज्येष्ठ संजय रामगीरवार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पसायदान ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाशराव गुंडावार होते. संस्कार भारती चंद्रपूरच्या अध्यक्ष संध्या विरमलवार, प्रांत कार्यकारिणी सदस्य मंगेश देऊरकर यांचीही मंचावर उपस्थिती होती.

यावेळी बोलताना संजय रामगीरवार यांनी संस्कार भारतीच्या उपक्रमाचे कौतुक करत कलेच्या माध्यमातून समाजमनावर उमटणारे संस्कार हे दीर्घकाळ टिकणारे आणि परिवर्तन घडवणारे असतात.कला केवळ मनोरंजन नाही, तर ती मूल्यांची, विचारांची आणि संवेदनशीलतेची प्रभावी शाळा आहे.समाजाला दिशा देणारी आणि मानवतेची जपणूक करणारी कला हे खऱ्या अर्थाने श्रेष्ठ साधन आहे असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणात प्रकाशराव गुंडावार यांनी सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे समाजमनावर पडणारे प्रतिकूल परिणाम रोखण्यासाठी सुदृढ संस्कार हेच सर्वात प्रभावी संरक्षण कवच ठरतात.मूल्याधिष्ठित विचार, सुसंस्कृत अभिव्यक्ती आणि सकारात्मक दृष्टिकोन यांची जपणूक केल्यास समाज दिशाहीन होत नाही.याच निष्ठेने संस्कार भारती कला आणि संस्कारांच्या माध्यमातून समाजमन घडविण्याचे पवित्र कार्य सातत्याने पार पाडत आहे असे मनोगत व्यक्त केले.

मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन आणि संस्कार भारती ध्येयगीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली.

प्रास्ताविकात अध्यक्ष संध्या विरमलवार यांनी खरी संस्कार केंद्रे असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना अर्थात पसायदान ज्येष्ठ नागरिक संघाला हा कार्यक्रम समर्पित करत असल्याचे सांगितले. यावेळी डॉ रमा गोळवलकर यांनी मुर्तीशास्त्र या विषयावर दृकश्राव्य सादरीकरण करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. नाट्य विधा प्रमुख सूरज उमाटे यांनी महर्षी भरतमुनी यांच्या वेशभूषेत मी भरतमुनी बोलतोय हे एकपात्री सादरीकरण केले. भरतमुनींवर पुष्पवृष्टी करत संस्कार भारती सदस्यांनी त्यांना वदंन केले. सामूहिक वंदे मातरम गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाचे संचालन डॉ भावना हस्तक यांनी केले तर आभार प्रदर्शन किरण पराते यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ राम भारत, लिलेश बरदाळकर,सुजित आकोटकर, प्राजक्ता उपरकर, अमोल दूधलकर, आशिष बाला, सोनाली धनमने, शरयू कुबेर, नीता उत्तरवार, पूनम झा, अपर्णा घरोटे आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here