
मिरा-भाईंदर – शहरातील सांस्कृतिक परंपरा आणि भक्तीचा वारसा जपत दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या वतीने मिरा रोड येथील बेवर्ली पार्कमधील नामदार गोखले मैदानावर चैत्र नवरात्रोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात येणार आहे. या उत्सवाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला. युवासेना कार्याध्यक्ष Purvesh Pratap Sarnaik यांच्या हस्ते विधीवत नारळ फोडून देवीच्या पाटाची व जागेची पूजा करण्यात आली.
यंदाचा हा भव्य नवरात्रोत्सव १९ मार्च ते २८ मार्च २०२६ या कालावधीत साजरा होणार आहे. दरवर्षी नवनवीन संकल्पना राबवणाऱ्या फाउंडेशनने यंदा दाक्षिणात्य मंदिरांच्या स्थापत्यशैलीवर आधारित भव्य देखावा उभारण्याचा संकल्प केला आहे. या देखाव्यामुळे भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र निर्माण होणार असून, शहराच्या सांस्कृतिक नावलौकिकात भर पडणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
हिंदू परंपरेनुसार चैत्र प्रतिपदेच्या दिवशी देवीचे प्राकट्य झाले आणि सृष्टीची निर्मिती झाली, अशी श्रद्धा आहे. त्याच मंगल क्षणाचे औचित्य साधून गेल्या चार वर्षांपासून हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून, यंदाचे पाचवे वर्ष अधिक भव्य स्वरूपात साजरे होणार आहे.
उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बोलताना Purvesh Pratap Sarnaik म्हणाले, “विकासाच्या गंगेसोबतच भक्तीचा जागर होणे ही काळाची गरज आहे. समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून शहरात मांगल्याचे वातावरण निर्माण करणे हा आमचा उद्देश आहे. हा केवळ आमचा कार्यक्रम नसून संपूर्ण मिरा-भाईंदरकरांचा उत्सव आहे.”
या नऊ दिवसांच्या महोत्सवात अखंड सहस्त्र नवचंडी यज्ञ, व्रत-पूजन, भजन, तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
भक्तीच्या या महापर्वात मिरा-भाईंदरकरांनी कुटुंबासह सहभागी होऊन देवीचा जागर करावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे
प्रबोधिनी न्यूज नेटवर्क
mojissports@gmail.com
8104170564















