
मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : कोल वॉशरीमधून होणारी कोळशाची वाहतूक आणि त्या माध्यमातून निर्माण होणारे प्रदूषण यावर प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आमदार अभिजीत वंजारी यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला.
प्रत्यक्षात पाहता, चंद्रपूर जिल्ह्यात आरटीओ विभाग आणि कोळसा वाहतूक करणारे काही कंत्राटदार यांच्यात संगनमत असल्याची परिस्थिती दिसून येत आहे. नियमांनुसार कोळसा वाहतूक करताना ट्रकवर ताडपत्री टाकून प्रदूषण रोखले जाईल, असा दावा केला जातो; मात्र प्रत्यक्षात तसे होत नाही. मोठ्या प्रमाणात धूळ आणि प्रदूषण निर्माण होत असून स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
याशिवाय या भागातील रस्त्यांची स्थितीही अत्यंत खराब झाली आहे. राजुरा तालुक्यातील अनेक गावांमधील रस्ते सिमेंटचे नसून त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. या खराब रस्त्यांमुळे अनेकदा स्थानिक नागरिकांचे अपघात होतात आणि विविध दुर्घटना घडतात.
प्रशासनाकडून अधूनमधून स्क्वॉड पाठवले जात असले तरी ते फक्त एक-दोन दिवस तपासणी करतात. त्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. ओव्हरलोड ट्रक चालवणे, ताडपत्री न लावता कोळसा वाहतूक करणे अशा अनेक प्रकारच्या अनियमितता मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे चित्र आहे.
त्यामुळे या समस्येवर केवळ तात्पुरते नव्हे तर दीर्घकालीन आणि ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. या संदर्भात सरकार कोणती ठोस पावले उचलणार आहे, असा थेट प्रश्न आमदार अभिजीत वंजारी यांनी उपस्थित केला.















