
संविधान चौक येथे निदर्शन : उपविभागीय अभियंता परचाके यांनाही देण्यात आले निवेदन.
राजुरा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – राजुरा तालुक्यात घरगुती व व्यावसायिक ग्राहकांच्या घरांवर सक्तीने स्मार्ट वीज मीटर बसविण्याची सुरू असलेली कार्यवाही तात्काळ थांबविण्यात यावी, अशी मागणी राजुरा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. देवेन्द्र फडणवीस यांना तहसीलदार राजुरा यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले. तसेच या निवेदनाची एक प्रत विद्युत विभागाचे उपविभागीय अभियंता परचाके यांनाही देण्यात आले आहे. संविधान चौक राजुरा येथे निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राजुरा तालुक्यात वीज वितरण यंत्रणेमार्फत नागरिकांची संमती न घेता तसेच योग्य जनजागृती न करता घरांवर स्मार्ट वीज मीटर बसविण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम व नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्मार्ट मीटरमुळे वीज दर वाढण्याची शक्यता, प्रीपेड प्रणालीमुळे सर्वसामान्य व गरीब कुटुंबांवर आर्थिक ताण येण्याची भीती तसेच तांत्रिक अडचणींमुळे ग्राहकांना विनाकारण त्रास सहन करावा लागू शकतो, अशी चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
यावेळी राजुरा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शासनाकडे राजुरा तालुक्यात सक्तीने बसविण्यात येत असलेल्या स्मार्ट वीज मीटरची कार्यवाही तात्काळ थांबवावी, या विषयावर सखोल अभ्यास करून नागरिक, तज्ञ व लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घ्यावा तसेच सर्वसामान्य ग्राहकांवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही याची स्पष्ट हमी शासनाने द्यावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. सक्तीची कार्यवाही न थांबविल्यास तीव्र जन आंदोलन उभारण्याचा इशारा काँग्रेसतर्फे देण्यात आला.
यावेळी राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे, जेष्ठ काँग्रेस नेते अँड. अरूण धोटे, काँग्रेसचे महिला जिल्हाध्यक्ष कुंदा जेनेकर, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, तालुकाध्यक्षा निर्मला कुडमेथे, उपाध्यक्ष धनराज चिंचोलकर, न. प. सभापती अनंता ताजने, सभापती पूनम गिरसावडे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक संध्या चांदेकर, जिल्हा महासचिव तथा नगरसेवक एजाज अहमद, संतोष इंदूरवार, अभिजीत धोटे, पंढरी चन्ने, नगरसेवक इंदुबाई निकोडे, निता बानकर, वज्रमाला बतकमवार, गोलू ठाकरे, ज्योतीताई शेंडे, सुमित्राबाई कुचनकर, अँड. चंद्रशेखर चांदेकर, छोटूलाल सोमलकर, शैलेश लोखंडे, प्रणय लांडे, कवडू सातपुते, सर्वानंद वाघमारे, भाष्कर वाटेकर, अशोक राव, सय्यद साबिर, संघपाल देठे, आकाश मावलीकर, निरंजन मंडल, चेतन जयपूर, निखील बजाईत, कुणाल माकोडे, काँग्रेस पक्षाच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशन चे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, युवक, शेतकरी व कामगार आणि नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.















