
श्रीगोंदा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – बांगर्डे गावातील जागृत देवस्थान श्री महादेव यांच्या पवित्र यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कावड यात्रेला यंदा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने सुरुवात झाली. गावातील भाविकांनी पारंपरिक पद्धतीने एकत्र येत बांगर्डे येथून कात्राबाद – मांडवगण येथे प्रस्थान केले.
या यात्रेत लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. भाविकांनी भगवे कपडे परिधान करून कावड यात्रा काढली; हे यात्रेचे विशेष आकर्षण ठरले. “हर हर महादेव” व “बोल बम” च्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. कात्राबाद – मांडवगण येथून पवित्र जल भरून ते बांगर्डे येथे आणून श्री महादेवांच्या चरणी अर्पण करण्यात येणार असल्याने यात्रेला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
कावड यात्रा ही केवळ धार्मिक विधी नसून गावातील एकोप्याचे, परंपरेचे आणि श्रद्धेचे प्रतीक मानली जाते. या यात्रेमुळे गावकऱ्यांमध्ये बंधुभाव, सहकार्य आणि सामाजिक एकजूट दृढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
यात्रेदरम्यान शिस्त, स्वच्छता व सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्यात आली. सर्व भाविकांनी नियमांचे पालन करत एकमेकांना सहकार्य केले. मार्गात ठिकठिकाणी पाणी व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती, त्यामुळे भाविकांना कोणतीही अडचण जाणवली नाही.
या कावड यात्रेचे नियोजन जय शेळके, तीर्थराज शेळके, बाबासाहेब शेळके, दादासाहेब शेळके, चक्रधर शेळके, संदीप उगले, भाऊसाहेब शेळके, शिवाजी शेळके, योगेश रिकामे, ओंकार शेळके, बाबा जाधव, दादा शेळके, धनंजय थोरात, साईनाथ घाडगे यांनी केले. संपूर्ण नियोजनाचे मानकरी म्हणून माजी चेअरमन श्री बाबासाहेब रिकामे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा यशस्वीपणे पार पडत आहे.
बांगर्डे गावातील ही कावड यात्रा दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाने पार पडत असून गावाच्या सांस्कृतिक परंपरेला उजाळा देणारी ठरली आहे.















