
एटापल्ली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : तालुक्यातील ग्रामपंचायत गटाटा अंतर्गत गोरगुटा गाव तसेच ग्रामपंचायत मेंढरी अंतर्गत येणाऱ्या गाव व टोले येथे मागील अनेक महिन्यांपासून वीज पुरवठा खंडित असल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर प्रश्नाकडे विद्युत वितरण विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत भारतीय कम्युनिस्ट पार्टी (भाकपा) गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, ग्रामसभा गोरगुटा व ग्रामसभा मेंढरी येथील नागरिकांनी या समस्येबाबत प्रथम विद्युत विभागाकडे वारंवार तोंडी तक्रारी केल्या, मात्र कोणतीही कार्यवाही न झाल्याने अखेर त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पार्टीकडे मदतीची मागणी केली असल्याचे समोर आले आहे.
भाकपाच्या वतीने कनिष्ठ अभियंता, विद्युत वितरण विभाग, एटापल्ली यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वीज पुरवठा सुरळीत करण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून विद्यार्थ्यांचे शिक्षण, पाणीपुरवठा व इतर मूलभूत गरजा बाधित होत आहेत.
यासोबतच संबंधित वीज लाईनची तात्काळ तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी व वीज पुरवठा पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या संदर्भात विभागाच्या अभियंत्यांनी दुरुस्ती करून वीज पुरवठा लवकरच सुरू करण्यात येईल, अशी हमी भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या प्रतिनिधींना दिली आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना भाकपा गडचिरोली जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार म्हणाले, गोरगुटा व मेंढरी परिसरातील नागरिक अनेक महिन्यांपासून अंधारात जीवन जगत आहेत. नागरिकांनी प्रथम विभागाकडे वारंवार तोंडी तक्रारी केल्या, मात्र कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे त्यांनी आमच्याकडे मदतीची मागणी केली आहे. आता अभियंत्यांनी दुरुस्तीची हमी दिली असली तरी तात्काळ काम पूर्ण होणे आवश्यक आहे, अन्यथा नागरिकांच्या हक्कासाठी भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन उभारले जाईल.
ही मागणी भाकपा गडचिरोली जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार, जिल्हा सदस्य कॉ. सुरज जककुलवार वतीने करण्यात आली.















