
पुणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : भीमा-कोरेगाव येथील दंगल प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरावे, तसेच आवश्यक पुरावे सादर न केल्यास आयोगाने त्यांच्याविरोधात विपरीत निष्कर्ष (अॅडव्हर्स इन्फरन्स) काढावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भीमा-कोरेगाव चौकशी आयोगाकडे केली आहे.
या संदर्भात ॲड. आंबेडकर यांच्या वतीने आयोगाकडे अर्ज दाखल करण्यात आला असून, शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेले पत्र आयोगासमोर सादर करण्याची मागणी करण्यात आली आहे. ते पत्र सादर न केल्यास संबंधितांविरोधात आयोगाने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणीही अर्जात करण्यात आली आहे.
या प्रकरणात शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना २०२१ मध्ये पाठवलेले पत्र आयोगासमोर आणण्याची मागणी यापूर्वी करण्यात आली होती. त्या पत्रात दंगलीची विशेष तपास पथकाद्वारे चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली होती, असा दावा अर्जात करण्यात आला आहे.
आयोगाने राज्य सरकारला म्हणणे मांडण्याचे आदेश दिले असून या मागणीमुळे भीमा-कोरेगाव प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. फडणवीस आणि त्यांच्या मुख्यमंत्री कार्यालयाने संबंधित कागदपत्रे आयोगासमोर सादर करावीत, अशी मागणीही ॲड. आंबेडकर यांनी केली आहे.















