
कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
२७ व २८ नोव्हेंबरदरम्यान सतत चारपाच दिवस पडलेल्या अवकाळी पावसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. कुणाचे उभे धानपीक कोलमडून पडले, तर मोठ्या प्रमाणात कापलेले धान कडपा पाण्यात पोहायला लागल्या. त्यामुळे शेतकरी पुर्णतः उद्ध्वस्त झाला आहे. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाने तातडीची नुकसान भरपाई घोषीत करावी, अशी मागणी सेवा सहकारी संस्था रत्नापूरचे संचालक मंगेश बोरकर यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
यावर्षी सुरूवातीलाच पाऊस कुठे योग्य प्रमाणात पडला तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. मात्र बहुतांश पिकांची चागल्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे उत्पादनात योग्य प्रमाणात वाढ होईल असे वाटत असतानाच धानपिकावर विविध प्रकारच्या रोगांनी आक्रमण केले. त्यामुळे उत्पादनात घट होणार असल्याने शेतकरी चिंताग्रत झाला. त्यात भरीस भर म्हणून धान कापणीच्या वेळी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. या पावसामुळे उभे धानपीक नष्ट झाले तर कुणाचे कापलेल्या धानाला अंकुर फुटले. पाण्यात धान सडले. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.














