रविंद्र मैंद
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्यूज
ब्रम्हपूरी येथील तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला. उपस्थित मान्यवरांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तथा बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, बाजार समितीचे संचालक किशोर राऊत, शहर काँग्रेस कमिटीचे सहसचिव सोमेश्वर उपासे, सोनोने सर, सुरेश वंजारी यांसह काॅंग्रेसचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना उपस्थित मान्यवर म्हणाले की, १९१२ मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी वकिली करण्यास सुरुवात केली. कमला नेहरू यांच्याशी त्यांनी १९१६ साली विवाह केला. १९१२ मध्ये झालेल्या बंकीपूर कॉंग्रेस अधिवेशनाला ते उपस्थित होते. ते महात्मा गांधीजींच्या विचारांचे समर्थक होते. १९१६ मध्ये ते प्रथमच महात्मा गांधींना भेटले आणि त्यांच्यापासून विलक्षण प्रेरीत झाले. जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या वडिलांनी आपल्या संपत्तीचा आणि विदेशी वस्तूंचा त्याग केला व स्वदेशी वस्तूंचा स्वीकार करून स्वातंत्र्यचळवळीला प्रोत्साहन दिलं. ते खादीचा वापर करू लागले. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९२८ मध्येच स्वतंत्र भारत चळवळ सुरु केली. १९२९ साली पं. नेहरू भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष झाले. तेथे संपूर्ण स्वातंत्र्याचे ध्येय्य निश्चित केले गेले. ७ ऑगस्ट १९४२ रोजी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या मुंबई अधिवेशनात त्यांनी भारत छोडो ही क्रांतीकारी घोषणा केली. पुढच्याच दिवशी त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आणि त्यांना अहमदनगर किल्ल्यात नेण्यात आले. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहिला. अनेक आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यात त्यांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल त्यांना १९५५ मध्ये ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

