बीड प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – साप्ताहिक मानपत्र च्या माध्यमातून गेली अनेक वर्ष परळी शहरात निर्भीड पत्रकारिता करणारे संपादक बालासाहेब जगतकर हे परळी तालुक्याला सर्वपरिचित आहेत. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले आहे. आणि आजही ते काम अविरतपणे करत आहेत.
आपल्या पत्रकारितेला त्यांनी तक्षशिला सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्याची जोड दिलेली आहे. या संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य, उपेक्षित, बहुजन समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे .
तक्षशिला सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून परळी शहरांमध्ये त्यांनी अनेक सामूहिक विवाह सोहळे आयोजित केले. या सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून गोरगरिबांच्या मुलांचे लग्न लावून दिले. खऱ्या अर्थाने आजच्या आर्थिक बिकट काळामध्ये सर्वसामान्य, कष्टकरी, मोलमजुरी करून खाणाऱ्या मुलींच्या पित्याला आपल्या मुलीचे लग्न लावून देणे अतिशय अवघड बाब झालेली आहे .वाढलेली प्रचंड महागाई, लग्नासाठी लागणारा अवाढव्य खर्च हा गोरगरीब पालकांना परवडत नाही. त्यामुळे अनेक मुलांचे आणि मुलींचे लग्न होऊ शकत नाहीत.
अशा सर्वसामान्य पालकांची गरज लक्षात घेऊन त्यांच्या जीवनात खारीचा वाटा उचलता यावा या हेतूने सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून 50 पेक्षा जास्त मुला, मुलींचे लग्न त्यांनी लावून दिलेले आहेत. तसेच आर्थिक हातभार लावावा या हेतूने भीम नगर परिसरातील प्रत्येक वधु पित्याला 5 हजार रुपये आर्थिक मदतही हे स्वतः देत आहेत. या सामाजिक कार्यातून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो याची भावना त्यांच्या मनामध्ये असते आणि या गोष्टीचा त्यांना आनंदही मिळतो .
महाराष्ट्र शासनाच्या वतीने रमाई घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येतात. या योजनेच्या माध्यमातून ज्यांना पक्के घर नाही अशांना चांगले हक्काचे घर मिळावे म्हणून शासन आर्थिक मदत देते. परंतु अनेक वेळा लाभार्थ्यांनी सर्व कागदपत्रासह फॉर्म भरल्यानंतर सुद्धा त्यांचे घरकुल मंजूर होत नाही. हे जेव्हा बालासाहेब जगतकर यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी परळी नगर परिषदेच्या विरोधात तसेच समाज कल्याण विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन केले. आणि परळीतील अनेकांना स्वतःचे हक्काचे घर उभे करण्यास मोलाची मदत केली.
रमाई घरकुल योजनेसाठी त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे अनेक घरकुलाच्या कामांचे भूमिपूजन त्यांचे हस्ते करण्यात आले. शहरातील धम्म चळवळीतही त्यांचे योगदान आहे. सुगंधकुट्टी बुद्ध विहारात प्रत्येक गुरुवारी त्यांनी सामूहिक बुद्ध वंदना चा कार्यक्रम आयोजित केला. तसेच या निमित्ताने अनेक चांगल्या विचारवंतांना व वक्त्यांना त्यांनी मार्गदर्शनासाठी उपलब्ध करून दिले .याचाही लाभ त्या भागातील युवा पिढीला झाला आहे .
त्यांचा हा सामाजिक वारसा त्यांचे चिरंजीव प्रेम जगतकर हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पुढे नेत्यांना दिसत आहेत .सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर त्यांनी यापुढेही असेच काम करीत राहावे याच त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

