दोन बसेसचा एकमेकांना धडक लागून भीषण अपघात; तर २५ जण जखमी

0
84

रायगड प्रतिनिधी- रायगड जिल्ह्यातील मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नागोठणेजवळ दोन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात पंचवीस जण जखमी झाले असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातील चाकरमान्यांनी गेल्या चार दिवसंपासून कोकणात गणेशोत्सवासाठी जाण्यास सुरूवात केली. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई येथून रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे जाण्यासाठी निघणारी बस आणि माणगावकडून मुंबईकडे जाणारी बस नागोठणे परिसरात एकेमकांवर समोरासमोर आदळल्याने भीषण अपघात झाला.

अपघातात सुमारे पंचवीस प्रवाशी जखमी झाले आहेत. या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असल्याने त्याचा फटका मुंबई येथून कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना बसला. दुसरीकडे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम गेल्या अनेक वर्षापासून रखडले आहे. महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाहतूककोंडीचा सामना करत प्रवास करावा लागत आहे.

गणेशोत्सवासाठी चाकरमानी दरवर्षी मुंबईतून कोकणात जातात. यावर्षी तरी गणेशभक्तांचा प्रवास कोणत्याही विघ्नाशिवाय होईल, अशी अपेक्षा होती. मात्र त्याला खो देत मुंबई – गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी बघायला मिळाली. गेली कित्येक वर्षे मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडलेलं आहे. आता या महामार्गाचं काम पूर्ण होण्यासाठी आणखी दोन वर्ष लागतील, असं सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे पुढची दोन वर्षे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागणार आहे. दरवर्षीच या महामार्गावर गणेशोत्सवाच्या काळात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते.

गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यातून पाच हजारपेक्षा जास्त एसटीच्या बसेस कोकणाकडे पाठवण्यात आल्या. या शिवाय हजारो खासगी वाहनं कोकणाच्या दिशेने निघाली आहेत. यामुळे महामार्गावरील वाहनांची संख्या खूप वाढली. परिणामी वाहतूक कोंडी निर्माण झाली. शुक्रवारी महामार्गावरील दोन्ही मार्गिकांवर वाहनांच्या सात ते आठ किलोमीटर लांब रांगा होत्या. या वाहतूक कोंडीमुळे अनेकांना आपलं गाव गाठण्यास उशीर होत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील गणेशोत्सवाच्या काळात होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाय शोधण्याची गरज आहे. तसंच या महामार्गाचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here