सम्यक दर्शन साहित्य समूह सोलापूर तर्फे महाराष्ट्राचा उत्कृष्ट कवी/कवयित्री स्पर्धा निकाल जाहीर

0
46

“महाराष्ट्राचे उत्कृष्ट कवी” ठरले मा. कवी – जयद्रथ आखाडे, पुणे तर “महाराष्ट्राची उत्कृष्ट कवयित्री” ठरल्या मा. कवयित्री- निर्मला जीवने, नागपूर.

सोलापूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – भारतीय मातीतल्या अनेक महापुरुषांनी, संतांनी, समाजसुधारकांनी समाजाला महत्वपुर्ण असे मार्गदर्शन केले आहे. लेखनाद्वारे, भाषणाद्वारे, भजन, कीर्तन, प्रवचन, नृत्य, कविता, गीते, नाटक, इत्यादीच्या माध्यमातून प्रबोधन केले गेले. आधुनिक जगात वावरतांना मनुष्य चांगल्या विचारापासून भरकटला जाऊ नये यासाठी आजच्या काळात देखील विविध प्रकारच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन सुरूच आहे. असाच एक प्रामाणिक प्रयत्न “सम्यक दर्शन साहित्य राज्यस्तरीय मंचाचा” आहे.

या अनुषंगाने “सम्यक दर्शन साहित्य राज्यस्तरीय मंच” यांचे तर्फे आठवडी काव्यलेखन स्पर्धा क्र.४ दि. २१ आँक्टोबर ते २५ आँक्टोबर २०२४ या दरम्यान घेण्यात आली होती. या स्पर्धेचा विषय होता, “जगद्गुरु संत तुकाराम महाराज”. या विषयावर झालेल्या काव्यलेखन स्पर्धेत महाराष्ट्रातील कवी आणि कवयित्रींनी सहभाग घेतला होता. या काव्यलेखन स्पर्धेत “महाराष्ट्राचा उत्कृष्ट कवी” हा सन्मान यावेळी कवी जयद्रथ आखाडे, पुणे यांना मिळाला आहे. वाचन, लेखन, पर्यावरण, पर्यटन तसेच सामाजिक,धार्मिक,शैक्षणिक क्षेत्रात काम करायची त्यांना आवड आहे. बुद्धिस्ट संविधानिक भिक्खू संघ, भारत यांचे कडून “धम्मरत्न पुरस्कार ” सहित अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्काराचे ते मानकरी आहेत. अनेक काव्यलेखन स्पर्धांमध्ये ते विजेते झाले आहेत. अनेक साहित्य समूहात त्यांचे सातत्याने लेखन सुरू आहे.

या स्पर्धेत “महाराष्ट्राची उत्कृष्ट कवयित्री ” चा मान मिळाला आहे कवयित्री निर्मला जीवने, नागपूर यांना. आजवर त्यांचे अनेक साहित्य विविध माध्यमातून प्रकाशित झाले आहे. त्यांचे शिक्षण एम. ए. बी. एड असून त्या सेवानिवृत्त शिक्षिका आहेत. त्यांचे ‘अजिंक्य नीर’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले आहे., ‘दवंडी’ तसेच ‘नवा संकल्प’ हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. सामाजिक व धार्मिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असून सामाजिक कार्यासाठी व साहित्याचे अनेक पुरस्कार प्राप्त आहेत.
दोन्ही कवींचे समूहाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व भविष्यकालीन वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

समाजाचे प्रबोधन सातत्याने होत रहावे या प्रांजळ हेतूने या आँनलाईन साहित्य समूहाची निर्मिती करण्यात आली आहे. या समूहाचे संस्थापक मा. देविदास गायकवाड तसेच सौ.सुनिता तागवान. हे असून वैशाली सुर्यवंशी व सुजाता उके ह्या प्रशासिका आहेत.

प्रत्येक आठवड्यात एक स्पर्धा घेतली जाईल. प्रत्येक आठवड्यात एक कवी व एक कवयित्री यांना हा सन्मान दिला जाणार आहे. तेव्हा पुढील स्पर्धांमध्ये साहित्यिकांनी सातत्याने सहभागी होत रहावे असे आवाहन समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here