नागाळा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन
दिपाली पाटील जिल्हा उपसंपादक चंद्रपूर – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे केवळ भक्तीमार्गी संत नव्हते, तर समाजजागृती करणारे एक क्रांतिकारक विचारवंत होते. त्यांच्या ओव्यांमध्ये, कीर्तनांमध्ये आणि विचारांमध्ये समाजपरिवर्तनाची शक्ती होती. त्यांनी आपल्या कीर्तनातून समाजातील अन्याय, अंधश्रद्धा, विषमता आणि गरिबीविरुद्ध लढा दिला. त्यांचा प्रत्येक शब्द हा परिवर्तनाचा मंत्र होता असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
सामुदायिक प्रार्थना मंडळाच्या वतीने नागाळा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार जोरगेवार बोलत होते. या कार्यक्रमाला राकेश पिंपळकर, स्वाती काकडे, अमोल शेंडे, गजानन निखाडे, दीपक ठाकरे, बंडू डाखोरे, नकुल वासमवार, राशिद हुसेन आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, आपल्या ग्रामगीतेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी गावांचा विकास आणि स्वावलंबन यावर भर दिला. गाव सुधारला की देश सुधारेल हा त्यांचा विचार आजही तितकाच महत्वाचा आहे. स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी लोकशिक्षणाचा आणि समाजपरिवर्तनाचा ध्यास घेतला.
आज समाजात फूट पाडणाऱ्या प्रवृत्ती वाढत आहेत, अंधश्रद्धा आणि असहिष्णुता पसरत आहे. अशा वेळी आपल्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार आचरणात आणून समाजसुधारणा आणि सामाजिक एकता यासाठी कार्य करावे लागणार आहे, असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.
गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार जनमानसात पोहोचवण्याचे उत्तम कार्य केले जात आहे. प्रत्येक भागात गुरुदेव सेवा मंडळाच्या शाखा सुरू करण्यात आल्या असून, त्यांच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाचे कौतुकास्पद कार्य सुरू आहे. या कार्यात येणाऱ्या अडचणींची जाणीव आम्हाला आहे. लोकप्रतिनिधी म्हणून शक्य ते सहकार्य या सत्कार्यात करण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे.
साखरवाही येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुतळ्याच्या सौंदर्यीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच ताडाळी येथे ५० लाख रुपयांच्या निधीतून आणि घुग्घूस येथे ३० लाख रुपयांच्या निधीतून भव्य समाजभवन उभारण्यात येत आहे, असेही आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.
राष्ट्रसंतांचे कार्य केवळ वंदन करण्यापुरते मर्यादित न ठेवता, त्यांच्या विचारांनुसार आपण समाजात शिक्षण, स्वच्छता, स्वावलंबन आणि बंधुभाव वाढवण्यासाठी कटिबद्ध झालो पाहिजे. आजच्या युवकांनी त्यांच्या विचारांचा अंगीकार करून राष्ट्राच्या उन्नतीसाठी कार्य करणे, हीच त्यांच्या स्मृतींना खरी श्रद्धांजली असेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाला गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

