पंकजा मुंडे यांनी या प्रकरणात संतोष देशमुखांच्या आईची माफी मागितली
मुंबई : संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. यावर आता बोलताना पंकजा मुंडे या दिसल्या आहेत. पंकजा मुंडे म्हणाल्या की, संतोष देशमुख प्रकरणावर मी सर्वात अगोदर मुख्यमंत्र्यांनी पत्र दिले. १२ डिसेंबरला मी यावर भाषण केले. मारहाणीचे व्हिडीओ पाहण्याची हिंमत माझ्यामध्ये नाहीये. या प्रकरणात कोणाचा हात आहे, ते न्याय व्यवस्थेला माहिती आहे. संतोष देशमुखांच्या झालेल्या हत्येनंतर मी संतोष देशमुखांच्या आईची हात जोडून माफी मागते.
ज्यांनी संतोष देशमुखांची हत्या केली, ते माझ्या पोटी जन्मलेली मुले असती तरीही मी माफ केले नसते आणि शिक्षा झाली पाहिजे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांची मंत्रिपदाची शपथच व्हायला नव्हती पाहिजे. राजीनामा तर फार पुढची गोष्ट आहे. राजीनाम्याला उशीरा झाला. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचे स्वागत मी करते, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे यांनी संतोष देशमुख प्रकरणात माैन बाळगले होते. मात्र, आता त्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून आमदार सुरेश धस हे थेट पंकजा मुंडे यांना टार्गेट करताना दिसले. त्यांनी थेट म्हटले की, पंकजा मुंडे या पर्यावरण मंत्री आहेत, त्यांना बीडशी काही देणे घेणे नाहीये. त्यांना बीडमध्ये काय सुरू आहे हे देखील माहिती नाहीये. गेल्या काही दिवसांपासून सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांच्यात वाद बघायला मिळतोय.
पंकजा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांच्या नजरा होत्या. शेवटी त्यांनी यावर भाष्य केले आणि थेट म्हटले की, राजीनामा घ्यायला उशीर झाला. पंकजा मुंडे यांनी असेही म्हटले की, धनंजय मुंडे आणि मी वेगळ्या पक्षाचे आहोत. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी सोबत मंत्रिपदाची शपथ घेतली होती. पंकजा मुंडे यांनी भाजपाकडून तर धनंजय मुंडे यांनी अजित पवार गटाकडून.

