
मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – गोरेगाव (मुंबई), दि. १८ एप्रिल २०२६ : गोरेगाव येथे काल पार पडलेल्या एका प्रेरणादायी आणि अभिमानास्पद समारंभात संविधान अभ्यासक व समाजप्रबोधनाचे अखंड दीप प्रज्वलित ठेवणारे नुरखाँ पठाण यांना ‘समाज प्रबोधन पुरस्कार’ाने सन्मानित करण्यात आले. ‘साथी चंदुभाई मेहता समाजसेवा प्रतिष्ठान’तर्फे आयोजित या कार्यक्रमात तुषार गांधी व हेमंत गोखले यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सन्मानात मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रु. ५०,०००/- चा धनादेश देऊन त्यांच्या समाजप्रबोधनाच्या कार्याचा गौरव करण्यात आला. पठाण सरांच्या प्रेरणादायी मनोगतांनी कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली.
आपल्या भाषणात त्यांनी हा पुरस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित करत आपल्या विचारांची दिशा स्पष्ट केली. तसेच हा सन्मान केवळ स्वतःचा नसून समाजप्रबोधनासाठी कार्य करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा असल्याचे नमूद करून त्यांनी नम्रतेचे दर्शन घडवले.
विशेष म्हणजे, पुरस्कार स्वरूपात मिळालेला रु. ५०,०००/- चा धनादेश त्यांनी आपल्या मातोश्रींच्या हस्ते ‘चंदुभाई मेहता प्रतिष्ठान’ला परत अर्पण करून समाजसेवेचा आदर्श घालून दिला.
यावेळी शबनम पठाण (पत्नी), मातोश्री, संस्थेचे प्रमुख सुधीर देसाई तसेच असंख्य संविधानप्रेमी बांधव उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मानसोहळा उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडला.
आजच्या काळात अशी निस्वार्थी वृत्ती आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी खरोखरच प्रेरणादायी असून, नुरखाँ पठाण यांचे कार्यच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख ठरते.















