लेख – “तृष्णा”

0
141

तृष्णा ही एक आस असते
व्याकुळ जीवाची हाक असते

तृष्णा म्हणजे तहान, शरीराला आवश्यक असणाऱ्या पाण्याची गरज. तहान ही एक नैसर्गिक भावना आहे. जी शरीरात पाण्याची कमतरता भासल्यावर निर्माण होते. ही केवळ मानवी शरीरातच नव्हे तर प्राणी पक्षी इतर जीवांमध्ये आढळणारी एक महत्त्वाची जैविक प्रक्रिया आहे. शरीरातील सर्व पेशी अवयव आणि जैविक प्रक्रिया योग्य प्रकारे चालण्यासाठी पाण्याची गरज असते. तहान ही भावना शरीराला पाण्याची गरज आहे हे सांगणारा एक नैसर्गिक संकेत असतो.
मानवी शरीरात 70% पेक्षा जास्त प्रमाणात पाणी असते. शरीरातील कार्य योग्य प्रकारे चालण्यासाठी पाण्याची गरज असते. शरीरातील पाणी घाम,लघवी आणि श्वासावाटे बाहेर टाकले जाते. त्यामुळे शरीराला सतत पाण्याची आवश्यकता असते. तहान लागली की मेंदू शरीराला संदेश देतो,आणि पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी आपल्याला पाणी प्यावेसे वाटते. शरीरात पाण्याची कमतरता भासली की थकवा डोकेदुखी चक्कर येणे असे समस्या जाणवतात. यासाठी नियमित अंतराने पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे.
प्राण्यांनाही तहान लागते. जंगलात राहणारे प्राणी नदी, तलाव किंवा ओढ्याच्या किनारी पाणी पिण्यासाठी येतात. वाघ, सिंह,हरणे,हत्ती यांसारखे प्राणी तहान लागली की आपोआप पाण्याच्या स्रोताकडे वळतात. काही प्राणी रात्री किंवा पहाटेच्या वेळी पाणी पिण्यासाठी बाहेर पडतात. कारण यावेळी थंड वातावरण असते आणि पाण्याचा शोध घेणे सोपे जाते. वाळवंटात राहणारे प्राणी दीर्घ काळ पाणीविना राहू शकतात. कारण त्यांच्या शरीरात साठविलेले पाणी त्यांना मदत करते.
पक्ष्यांनाही तहान लागते. अन्न आणि पाण्याच्या शोधात पक्षी फिरतात. ते पाण्याच्या साठ्याचा शोध घेतात. काही पक्षी सकाळच्या दवबिंदू मधून पाणी घेतात. तर काही पक्षी छोटी तळे,ओढा ही किंवा पानवठ्याजवळ जाऊन पाणी पितात. उन्हाळ्यात अनेक पक्ष्यांना तहान भागवण्यासाठी मानवांनी तयार केलेल्या पाणवठ्याचा फायदा होतो.
उन्हाळ्यात पक्षी आणि प्राण्यांना पाण्याचा तुटवडा जाणवतो त्यामुळे मानवांनी आपल्या घराच्या अंगणात बाल्कनीत किंवा बागेत पाणी ठेवण्याची खबरदारी घ्यावी. पाळीव प्राणी जसे कुत्री, मांजरे,गाई,म्हशी व पाळीव पक्षी जसे पोपट, कोंबडी, बदक, शहामृग यांसारख्या पक्षांना देखील गरज भागेल इतके पाणी द्यावे. जंगली प्राण्यांसाठी नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन करणे ही देखील मानवाची महत्त्वाची जबाबदारी आहे.
तृष्णा ही फक्त नैसर्गिक भावना नसून जीवसृष्टीच्या टिकाऊपणासाठी अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट आहे. मानव प्राणी आणि पक्ष्याना जीवन, अस्तित्व टिकवण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. तहान भागविण्यासाठी योग्य वेळी पाणी पिणे आणि इतर जीवांना पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करणे हे आपण सहज करू शकतो. पक्ष्यांसाठी उथळ पाण्याची भांडी ठेवावी जेणेकरून ते सहज पाणी पिऊ शकतील. रोज या भांड्यात मध्ये स्वच्छ पाणी भरावे,नियमित साफसफाई करावी बागेत आणि मोकळ्या जागेत लहान तळे किंवा पाणवठे तयार करावेत. झाडाखाली किंवा सावलीच्या ठिकाणी पाणी साठवण्यासाठी लहान खोलगट भाग तयार करावा. प्लास्टिक किंवा सिमेंटच्या टाक्या वापरून पाणी साठवले तरी चालते. घराच्या खिडक्यांजवळ पक्ष्यांना बर्डबाथ घेण्यासाठी व पाणी पिण्यासाठी एक साधे भांडे ठेवावे. त्यात रोज स्वच्छ आणि थंड पाणी टाकावे.
झाडे लावावी व त्यांचे संवर्धन करावे यामुळे पर्यावरणात गारवा टिकून राहतो. झाडाखाली पाणी ठेवले तर प्राणी व पक्षी तिथे विसावा घेऊ शकतात. मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करावी आणि पर्यावरण समतोल राखावा. नद्या तळे विहिरी यांचे संवर्धन करावे. जलप्रदूषण टाळावे, नैसर्गिक जलस्रोत स्वच्छ ठेवावी. पाण्याची बचत करावी आपण पाणी जपून वापरले तर नद्यांमध्ये आणि जलस्रोतांमध्ये पुरेसा पाणीसाठा राहील. यासाठी पाण्याचा अपव्यय टाळावा पावसाचे पाणी साठवून त्याचा वापर प्राणी आणि पक्षांसाठी केला जाऊ शकतो.
सार्वजनिक ठिकाणी आणि रस्त्यांच्या कडेला पाण्याच्या टाक्या ठेवाव्या. गावामध्ये जलसंधारणाची कामे करावी शाळा महाविद्यालय व सामाजिक संस्थामार्फत मोहीम राबवाव्यात. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना जागृत करणे आणि मदतीसाठी आवाहन आम्ही या माध्यमातून करत आहोत.
प्राणीपक्ष्यांना पाणी मिळाले नाही तर त्यांचे जीवन धोक्यात येईल मानवाने आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था केली पाहिजे.झाडे लावणे, जलस्रोतांचे संरक्षण करणे आणि त्यांच्या साठी नियमित पाणी ठेवणे यामुळे प्राणी पक्ष्यांचे जीवन सुखकर होईल.

तृष्णा भागवू पशुपक्ष्यांची
चला एक संकल्प करू
अंगणात पाणपोई ठेवून
सत्कर्माचा ध्यास धरू

सौं. पल्लवी संजय आल्हाट
अध्यक्ष प्रेरणा बहुउद्देशीय फाउंडेशन, श्रीरामपूर.
मोबा. नं. 8010912295

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here