प्रणाली येरपुडे विशेष तालुका प्रतिनिधी चंद्रपूर – तब्बल १३ वर्षांनंतर होणाऱ्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीबाबत आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबईतील मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महत्त्वपूर्ण चर्चा केली. याआधीही त्यांनी वेळोवेळी मुख्यमंत्री यांचे निवडणूक प्रक्रियेतील अनियमितता व गैरप्रकारांकडे लक्ष वेधले होते.
२०१२ नंतर आता २०२५ मध्ये होत असलेल्या बँकेच्या निवडणुकीबाबत न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणतेही धोरणात्मक निर्णय न घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, बँकेच्या सध्याच्या व्यवस्थापनाने हे आदेश धाब्यावर बसवत काही निर्णय घेतले आहेत, असा आरोप होत आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी बँकेवर सायबर हल्ला झाला होता. या हल्ल्यात ३ कोटी ७५ लाख रुपयांची फसवणूक झाली होती. त्यापैकी केवळ १ कोटी रुपये परत मिळाले असून उर्वरित २ कोटी ७५ लाख रुपये बँकेने ग्राहकांना परस्पर परत केले. हा निर्णय बँकेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कोणतीही अधिकृत परवानगी न घेता घेतल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणातही अनेक वित्तीय गैरप्रकार झाल्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या बैठकीत आमदार जोरगेवार यांनी या सर्व प्रकारांबाबत माहिती दिली. तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शक व न्याय्य होण्यासाठी मुख्यमंत्री यांनी लक्ष घालावे, अशी मागणी केली.
अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीसाठी ५ लाख रुपयांची मदतीची मागणी.
तुकूम येथे काही दिवसांपूर्वी हायवा वाहनाच्या धडकेत मृत्यू झालेल्या सानिका कुमरे या २२ वर्षीय विद्यार्थिनीच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
हायवा वाहन चालकाला फिट आल्याने त्याचे वाहन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिकांवर घसरले. या दुर्घटनेत सानिकाचा जागीच मृत्यू झाला, तर तिची मैत्रीण काजल गंभीर जखमी झाली. आमदार जोरगेवार यांनी अपघातानंतर घटनास्थळी भेट दिली होती. तसेच रुग्णालयात जात काजलची प्रकृतीची विचारपूस केली होती.
सावनेर खान पर्यटन पाहणीचा दिला मुख्यमंत्र्यांना आढावा
नुकतीच आमदार किशोर जोरगेवार यांनी नागपूर येथील सावनेर येथील भूमिगत खान पर्यटन प्रकल्पाची पाहणी अधिकाऱ्यांसह केली होती. या धर्तीवर चंद्रपूर येथील महाकाली कॉलरीच्या बंद भूमिगत खाणीत पर्यटन सुरू करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.

