ब्रह्मपुरीत नागरिक व शेतकऱ्यांचा आक्रोश; काँग्रेसचा महसूल विभागाला इशारा

0
129

दोन दिवसात उत्खनन थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन!

रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज – ब्रह्मपुरी, दि. १९ जून (प्रतिनिधी) – ब्रह्मपुरी तालुक्यातील शेतकरी, कामगार, युवक व नागरिक विविध समस्यांनी ग्रासलेले असताना महसूल व वन विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे जनतेचा सरकारवरील विश्वास ढासळत चालला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष, अवैध वाळू उत्खननाचा सुळसुळाट आणि शहरातील नागरी समस्या यामुळे जनतेच्या संतापाला तोंड फुटले आहे. या पार्श्वभूमीवर तालुका काँग्रेस कमिटी, ब्रह्मपुरीने मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे, अन्यथा दोन दिवसांत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

काँग्रेसने दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, खरीप हंगाम सुरू असतानाही शेतकऱ्यांना धान्याचा बोनस मिळालेला नाही, कर्जमाफी अंमलात आलेली नाही, आणि कीटकनाशके-खते-बियाण्यांचे वाढते दर शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करत आहेत. सौर ऊर्जेची सक्ती, अन्नदाता शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर मिळणाऱ्या अपुऱ्या भरपाई, मनरेगामध्ये शेतीकामांचा समावेश न होणे आणि हमीभावाचा अभाव अशा प्रश्नांनी शेतकरी त्रस्त झाले आहेत. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.

काँग्रेसने आरोप केला की, तालुक्यातील वाळू घाटांवर ठेकेदारांकडून परवानगीच्या मुदतीनंतरही उत्खनन सुरू आहे. विना रॉयल्टी वाळू वाहतूक सर्रासपणे सुरू असून महसूल अधिकारीच या लुटीला संरक्षण देत आहेत. या गंभीर प्रकारात संबंधित अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, BNS कलम 257 व लोकसेवा शिस्त नियमांतर्गत तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

वनहक्क योजनेतील झाडलावणी व इतर कामांमध्ये ‘राधे ऑर्गनायझेशन’ या संस्थेने मोठा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप करत संस्थेची नोंदणी रद्द करून संचालकांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी ठाम भूमिका काँग्रेसने मांडली आहे.

मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात काँग्रेसने ब्रह्मपुरी शहरातील भीषण नागरी अडचणींचा पाढा मांडला आहे. अर्धवट गटारी काम, अपूर्ण रस्ते, अपायकारक चिखल, अपुरे मनुष्यबळ, डासांचा उपद्रव, कीटकनाशक फवारणीचा अभाव, अस्वच्छ व अपुऱ्या सार्वजनिक शौचालयांची दुर्दशा, अंधारलेले रस्ते, आणि पाण्याची गढूळ व अपुरी पुरवठा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
बाजार चौकातील सुशोभीकरणाच्या नावाखाली सुमारे ५० हून अधिक झाडांची तोड होण्याची शक्यता असून, काँग्रेसने तीव्र विरोध दर्शवत झाडांचे जतन करण्याची स्पष्ट भूमिका घेतली आहे. झाडांच्या छायेखाली वाढलेल्या परिसराच्या सौंदर्याला गालबोट लावणाऱ्या कोणत्याही निर्णयाचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.

तालुका काँग्रेस कमिटीने दिलेल्या दोन्ही निवेदनांत नागरिक व शेतकऱ्यांच्या मनातील आक्रोश ठळकपणे मांडला आहे. या मागण्या केवळ निवेदनापुरत्या मर्यादित नसून, त्या हजारो जनतेच्या भावना आहेत. शासनाने या मागण्यांकडे केवळ एक औपचारिक कागदपत्र म्हणून न पाहता, जनतेच्या वेदनांचा दस्तऐवज म्हणून तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा काँग्रेसने दिला आहे.
निवेदन देताना तालुका काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here