
पुणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : पुण्यातील पूनम मुन यांच्या झालेल्या क्रूर हत्याकांडाने संपूर्ण राज्य हादरले आहे. या प्रकरणात भाजपच्या विधी शाखेचा पदाधिकारी असलेला वकील सावंत, त्याची पत्नी आणि मुलीने मिळून हे हत्याकांड केल्याचा खळबळजनक आरोप ‘ऑल इंडिया पॅंथर सेने’चे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी केला आहे. सत्तेचा गैरवापर करून हे प्रकरण दडपले जात असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
सत्ताधाऱ्यांवर टीकेची तोफ
पूनम मुन हत्या प्रकरणावरून दीपक केदार यांनी सरकारवर बोचरी टीका केली आहे. “नारीशक्ती विधेयक नामंजूर झाले म्हणून संसदेत रडणाऱ्यांना, एका बौद्ध महिलेची अशी क्रूर हत्या झाली असताना रडू का येत नाही?” असा जळजळीत सवाल त्यांनी विचारला आहे. भाजप आपल्या पदाधिकाऱ्याला वाचवण्यासाठी पोलीस प्रशासनावर दबाव टाकत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
राज्यभर आंदोलनाचा इशारा
पूनम मुन यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी ऑल इंडिया पॅंथर सेना आता आक्रमक झाली आहे. हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न थांबले नाहीत आणि आरोपींवर कडक कारवाई झाली नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दीपक केदार यांनी दिला आहे.
या घटनेमुळे पुण्यात दलित संघटनांमध्ये संतापाची लाट असून, या हायप्रोफाईल हत्याकांडाकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.















