
श्रावणाच्या कितीतरी आठवणी.. मनात घर करून आहेत आणि खरंच श्रावणमहिना आला की श्रावण मासी हर्ष मानसी… हे गाणे गुणगुणायला आपसूकच मन तयार होतं.श्रावण म्हणजे पावसाचा मध्यान सुरू झालेला असतो, शेतकरी पेरणी करत असतो किंवा पेरणी झालेलीही असते, म्हणजेच पिके बहारात आलेली असतात…, सर्वत्र नदी नाल्या डोंगरदऱ्या पावसाच्या थेंबाने वाहत असतात, पाऊस सुद्धा तुम्हाला तृप्त करून सोडत असतो, या जलधारा मनामनाला भिजवत असतात. नोकरदार वर्ग तर सहलींचा आनंद मनमुराद घेत असतो, पावसाळी सहली, पावसाळी गाणी, पावसाळी भोजन, वनविहार यांना उधाण आलेलं असतं..
मुक्तहस्ताने निसर्ग तुमच्यासोबत बोलत असतो,
तुम्ही निसर्गाच्या अधिकाधिक जवळ जातात..नुकतीच आषाढी एकादशी झालेली असते टाळ,विणा,पेटी आणि हरिनामाचा जयघोष यांनी आसमंत दुमदुमलेला असतो.हा फक्त पायी पदयात्रेचा पवित्रा नाही तर निसर्गाच्या कुशीत विसावलेल्या संपूर्ण जिवमात्राला पावन करण्याचे काम पार पडलेले असते आणि आता त्यात अधिकाधिक सौजन्य यावे आपल्या मनातील भक्तीभाव तसाच जागृत रहावा किंबहुना या व्रतवैकल्यात अधिक भर पडावी म्हणून श्रावण या महिन्याच आगमन झालेल असत अस मला वाटत ..
आणि मग लहानग्यांचा आनंद कोण द्विगुणित करणार तर…गावोगावच्या जत्रा आपल्यासोबत मोठमोठे पाळणे,खेळणी घेऊन सज्ज झालेली असतात आमच्यातील लहान मुलांना अधिकाधिक हर्षोल्हसित करायला श्रावणाचे आगमन झालेले असते.
अशाप्रकारे सर्व महिन्यांपेक्षा धार्मिक असणारा,निसर्गाने नटलेला,सर्व प्राणिमात्रांना वेडावणारा,तुमच्या आमच्यातली माणुसकी अधिकाधिक प्रभावी करणारा,आकाश पाताळातून गर्जना ऐकवणारा आपला परममित्र श्रावण महिन्याच आगमन होत आहे अस मला वाटत…
भक्ती संकेत केंजळे
करंजे,पुणे.















