prabodhini news logo
Home एटापल्ली एटापल्ली शहरातील मुख्य रस्त्याचे काम सुरू करणे शक्य नाही

एटापल्ली शहरातील मुख्य रस्त्याचे काम सुरू करणे शक्य नाही

0
153

सार्वजनिक बांधकाम विभागाचा अहवाल; भाकपा ला लेखी माहिती

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – एटापल्ली : एटापल्ली नाका ते वीर बाबूराव शेडमाके चौक दरम्यानचा मुख्य रस्ता खड्डेमय अवस्थेत गेल्या अनेक महिन्यांपासून लोकांच्या दैनंदिन व्यवहारात अडथळा ठरत आहे. या मार्गावरून दररोज शालेय विद्यार्थी, महिला, दुचाकी व चारचाकी वाहनचालक यांचा प्रवाह आहे. विशेषतः पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे अपघातांचा धोका निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या दुरुस्ती व डांबरीकरणाची मागणी नागरिकांकडून सतत होत आहे.

याच संदर्भात कॉ. सचिन मोतकुरवार (भाकपा, जिल्हा सहसचिव) यांनी ३ सप्टेंबर २०२५ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवणे व कायमस्वरूपी डांबरीकरण करण्याची मागणी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभाग, आलापल्ली येथील कार्यकारी अभियंता यांनी भाकपा नेत्याला लेखी पत्राद्वारे सविस्तर माहिती दिली आहे.

काय आहे विभागाचा अहवाल?

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अहवालानुसार, एटापल्ली येथील हा मार्ग राज्यमार्ग क्रमांक ३६३ अंतर्गत नाग-१३७ प्रकल्पांतर्गत सिमेंट काँक्रीट (C.C.) रस्त्याकरीता मंजूर आहे. करारनाम्यानुसार एटापल्ली गावात १२.०० मीटर रुंदीचा C.C. रस्ता प्रस्तावित होता; परंतु सध्याची वास्तविक स्थिती २४.०० मीटर रुंदीच्या रस्त्याची आहे, ज्यावर साधारणतः ९.०० मीटर रुंदीचा डांबरी (bituminous) भाग आहे. या फरकामुळे रस्त्याच्या रचनेत व करारनाम्यात बदल करावे लागणार आहेत. त्यामुळे शासनाकडे वाव बदल प्रस्ताव सादर करण्यात आला असून तो मंजूर न झाल्याशिवाय कायमस्वरूपी काम सुरू करणे शक्य नाही, असे पत्रात नमूद आहे.

रस्ता दुभाजकाबाबत स्थिती

विभागाने स्पष्ट केले आहे की, एटापल्ली शहरातील मुख्य रस्त्याच्या मधोमध दुभाजक बांधण्याबाबतचा स्वतंत्र प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, सदर दुभाजकाला सध्यापर्यंत मंजुरी प्राप्त झालेली नाही. त्यामुळे दुभाजकाचे काम सुरू करणे सध्या शक्य नाही.

तात्पुरती दुरुस्ती आणि कंत्राटदारांची जबाबदारी

विभागाने सांगितले आहे की, वाव बदल मंजूर होत नसल्यानेही नागरिकांसाठी वाहतुकीची सोय राखण्यासाठी करारनाम्याच्या कलमांनुसार संबंधित कंत्राटदारांना रस्त्याची देखभाल व वेळोवेळी खड्डे दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पत्रात नमूद केले आहे की खड्डे दुरुस्तीचे काम वेळोवेळी कंत्राटदाराद्वारे केले जात आहे व संबंधित छायाचित्रे संगृहीत आहेत. वाव बदल मंजूर होताच पूर्ण प्रकल्प ताबडतोब पुढे नेण्यात येईल, असे विभागाने स्पष्ट केले आहे.

भाकपा ची मागणी आणि भूमिका

भाकपा जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांनी विभागाच्या लेखी उत्तराबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले, पालकमंत्री,आमदार ,खासदार ला खदान चा विकास सोडून प्रत्यक्ष एटापल्ली तालुक्याचा विकास करायला वेळ नाही आहे.
पुन्हा कॉ.सचिन मोतकुरवार म्हणाले की
“विभागाने दिलेल्या माहितीनुसार वाव बदल प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच कायमस्वरूपी बांधकाम शक्य आहे. मात्र, मुख्य रस्ता व दुभाजक काम दोन्हींच्या मंजुरी प्रक्रियेत होणाऱ्या विलंबामुळे एटापल्लीतील नागरिकांना दीर्घकाळ त्रास सहन करावा लागतोय. शासनाने तात्काळ मंजुरी देऊन ठोस बांधकाम सुरु करावे, हीच जनतेची मागणी आहे.”

पुढील पावले

सार्वजनिक बांधकाम विभागाने वाव बदल प्रस्ताव तसेच दुभाजक बांधकामाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे.
या दोन्ही प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यानंतरच नाग-१३७ प्रकल्पांतर्गत C.C. रस्त्याचे बांधकाम आणि दुभाजकाचे काम सुरू होईल. तोपर्यंत करारनाम्याच्या अटींनुसार केवळ तात्पुरती देखभाल व खड्डे दुरुस्ती केली जाणार आहे, असे विभागाने स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here