
संपत्तीच्या हव्यासामुळे बिघडत चाललेले नातेसंबंध आणि उद्भवणारे कौटुंबिक अंतर्गत कलह याचे दर्शन घडविणारे वेंकटेश्वरा नाट्य मंडळ नवरगाव प्रस्तुत नाटक म्हणजेच’ पैसा रे पैसा ‘ होय . या सामाजिक, कौटुंबिक सुखांतिकेने प्रेक्षकांना सजग केले.
नाटकातील कथानक अंशतः काल्पनिक असले ;तरी घरातील वास्तविक घटनांचे चित्रण करणारे आहे. एका आदर्श शिक्षक असलेल्या बापाच्या संस्काराचे बीज वटवृक्षात रूपांतर होत असतानाच जाणीवपूर्वक गरीब घरातील मुलगी, सून म्हणून घरात आलेल्या लक्ष्मीने नकळत कैकईचे रूप धारण केले व त्या वटवृक्षाचे मूळ कमजोर होऊ लागले. असे असले तरी शेवट मात्र गोड झाला याचा अत्यानंद.. संपूर्ण नाटक बघितल्यानंतर घराशेजारी घराच्या पाठीमागे चालत असलेल्या विषयाची जबरदस्त आठवण होते व काळजाला लागते..
पात्रचित्रण व अभिनय
नाटकातील सर्व पात्र उत्तम असून सर्वांना न्याय मिळवून देण्याचे कार्य कथानकाने केले आहे. सर्व पात्राचे अभिनय उत्तम असून पात्राचे रेखाटन खूप सुंदर पद्धतीने केले आहे. नाटकातील आदर्श शिक्षक बापाची भूमिका व अभिनय उत्तम आहेच यात शंका नाही. राष्ट्रपती यांच्या हाताने गौरविण्यात आलेल्या एका हाडामासाच्या शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या घडवून देशाला चांगले नागरिक दिले.त्यांच्याच घरातील चार भिंतीआड घडत असलेल्या घटना मुळे त्यांच्या मनावर किती ताण आला असेल याचा अंदाज कथानकातून आपल्याला घेता येतो . एकीकडे त्याने घडवलेला समाज आणि दुसरीकडे कुटुंबातील आंतरिक कलहामुळे त्याच्या तत्त्वांना पैशामुळे निर्माण झालेल्या विकृतीच्या चितेवर जळताना पाहून प्रेक्षकांना डोळ्यातून अश्रू गाळण्यास भाग पाडलं यात मात्र तीळ मात्रही शंका नाही..अविनाश ची भूमिका नाट्य रसिकांना विचार करण्यास प्रवृत्त करते कारण तो इच्छा नसताना कोणीतरी विणलेल्या फासात अडकलेला आहे .त्यामुळे त्याची द्विधा मनस्थिती आहे रसिकांना एकीकडे त्याचा राग येतो तर प्रसंगानुसार त्याची मजबुरी समजून त्याच्या पाठीशी सांत्वना मिळते..
अविनाश ची बायको कांचन ची भूमिका कथानकात पुरणपोळीला लागलेल्या मुंगी सारखी आहे जी कथानातील मूळ गाभा म्हणायला हरकत नसावी . त्यामुळे तिची भूमिका संपूर्ण कथानकात प्रेक्षकांना भुरळ घालणारी आहे .
नाटकातील उरलेले दोन भाऊ कथानकातील महत्त्वाच्या दोन बाजू असून कथेला योग्य दिशा देतात व रसिकांना विचार करण्यास भाग पाडतात..
कांचनचे वडील झेंडे साहेब यांची भूमिका तर परिश्रम करून बांधलेल्या महालावर थोड्या गर्जनामुळे पडलेल्या विजेसारखी आहे ज्यांनी महालाचे राखेत रूपांतर झाले त्यांचे संवाद अप्रतिम दर्जाचे असून संवादातील विविधता राखण्यास आधारस्तंभ ठरले आहे..
वकील साहेबांची भूमिका कथनाकातील एक गुड रहस्य आहे ज्याविषयी रसिक अनभिज्ञ असतात.ऐनवेळी येऊन कथानकाला अंशतः आलेला थकवा घालवून जातो.
आशाची भूमिका म्हणजे पारंपारिक संस्काराचे मोती जी कथनाकातून सुंदर मांडण्यात लेखकाने कमतरता ठेवली नाही आणि नाट्यकर्मीने सुद्धा भूमिकेला योग्य न्याय दिला आहे.
काश्या आणि कमली ची भूमिका ही नाट्य रसिकांचा लक्ष वेधून घेणारी आहे विनोदी संवाद जरी असले तरी पण कथानकाच्या मूळ गाभ्याला योग्य पद्धतीने आकार देणारी आहे.. जणू काही दह्यात पडलेल्या साखरेसारखी..
बालकलावंताचे कथानकातील स्थान व बालकलावंतांनी त्याला दिलेला न्याय अप्रतिम दर्जाचा आहे. त्याची जेवढी स्तुती करावी तेवढी कमीच..
वरील नाट्यप्रयोगाच्या लेखकांचे व दिग्दर्शकांचे मनःपूर्वक आभार अप्रतिम अशी नाट्यकृती रसिकांसाठी दिली..
समोरील वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा…
दीपक नारायण जिभकाटे
अर्जुनी/मोर.















