
सिंदेवाही येथे श्री. संत नगाजी व संत सेना महाराज पुण्यस्मरण सोहळा संपन्न
सिंदेवाही प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षण हा एकमेव भक्कम पाया आहे. उच्च शिक्षण घेतल्याशिवाय समाजाला नवी दिशा मिळू शकत नाही. संत नगाजी व सेना महाराजांनी आपल्या विचारांद्वारे समाजात समता, बंधुता आणि परस्पर सन्मानाची शिकवण दिली. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आजच्या पिढीने शिक्षणाला प्राधान्य दिले पाहिजे असे प्रतिपादन सिंदेवाही येथे संत नगाजी नाभिक समाज द्वारा आयोजित श्री संत नगाजी व संत सेना महाराज यांच्या पुण्यस्मरण सोहळ्यात उपस्थित बांधवांशी बोलताना केले.
गरिब, वंचित आणि ग्रामीण भागातील मुलांनी उच्च शिक्षण घेतले तरच समाजातील विषमता कमी होईल. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक युगात स्वतःला सिद्ध करावे. संतांचा संदेश केवळ भक्तीपुरता मर्यादित नसून तो समाज परिवर्तनाचा मार्ग आहे. शिक्षण, संस्कार आणि सामाजिक एकजूट या त्रिसूत्रीच्या माध्यमातून समाज सक्षम होऊ शकतो. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून कौशल्याधारित शिक्षणाकडे वळावे असे आवाहन केले. नाभिक समाजाच्या समस्या शासन दरबारी समर्थपणे मांडून समाजाला न्याय देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार अशी ग्वाही दिली.
या सोहळ्यास अध्यक्ष म्हणून नाभिक समाजाचे जेष्ठ सल्लागार प्रभाकर फुलबांधे, मुरलीधर मेंढुलकर, डॉ.केशव शेंडे, तालुका काँग्रेस अध्यक्ष रमाकांत लोधे, शहर काँग्रेस अध्यक्ष सुनील उट्टलवार, माजी सभापती विरेंद्र जयस्वाल,माजी नगराध्यक्ष स्वप्नील कावळे, प्रा.राजेश डहारे,माजी प.स. सदस्य राहुल पोरेड्डीवार, राहुल बोडणे, सुधीर पंदिलवार , अभिजित मुप्पिडवार, महेश मंडलवार, युनुस शेख,सचिन नाडमवार, यांचेसह नाभिक समाज मंडळ पदाधिकारी मंचावर उपस्थित होते. तत्पूर्वी नाभिक समाजातील प्रा. राजेश डहारे व कवडुजी मांडवकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.












