
माजलगाव येथे जिल्हास्तरीय धम्मप्रचारक गौरव सोहळा उत्साहात पार
माजलगाव (बीड) प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला सद्धम्माचा विचार घराघरात पोहोचवणाऱ्या धम्मयोद्ध्यांचा सन्मान करण्यासाठी माजलगाव येथे आयोजित करण्यात आलेला जिल्हास्तरीय गौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. “बुद्धांचा मार्ग हा मानवी कल्याणाचा मार्ग आहे, त्यामुळे केवळ नावापुरते बौद्ध न राहता जातीचे बंधन तोडून पंचशील आणि २२ प्रतिज्ञांचे आचरण करणे हीच काळाची गरज आहे,” असा सूर या सोहळ्यात उमटला.
कार्यक्रमाची सुरुवात आणि मानवंदना
जनकल्याण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व सातकर्णी युवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रावस्ती बौद्ध विहार, केसापुरी कॅम्प येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात भगवान बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने उपस्थित मान्यवरांना शिस्तबद्ध मानवंदना देण्यात आली, ज्यामुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रदीप भोगले यांच्या हस्ते झाले. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, “आपल्या कृती आणि करणीमध्ये अंतर असू नये. बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा केवळ वाचण्यासाठी नसून त्या जगण्यासाठी आहेत. अष्टांगिक मार्गाचा अवलंब करूनच आपण समाजाला नवी दिशा देऊ शकतो.”
मुख्य वक्ते प्रा. श्रीकिशन मोरे यांनी आपल्या अमोघ वाणीने उपस्थितांना अंतर्मुख केले. ते म्हणाले, “बाबासाहेबांनी आपल्याला सर्व काही दिले, पण आपण समाजाला काय दिले याचा विचार करण्याची वेळ आली आहे. पाली ही आपली सांस्कृतिक भाषा असली तरी ती बोलीभाषा नाही, त्यामुळे बौद्धाचार्यांनी धम्माचा अर्थ मराठीतून समजावून सांगावा जेणेकरून तो सर्वसामान्यांना समजेल.” त्यांनी पुढे पोटजातींचा त्याग करून केवळ ‘बौद्ध’ म्हणून एकत्र येण्याचे आणि इतर जातींतून धम्मात आलेल्या बांधवांना प्रेमाने सामावून घेण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय समारोप करताना विद्वत सभेचे अध्यक्ष भास्करराव भोजने म्हणाले की, “बाबासाहेबांनी जातीचा अंत करण्यासाठी धम्मचक्र प्रवर्तन केले. आपण त्यावर ठाम राहिले पाहिजे. आपले संवैधानिक अधिकार अबाधित राखणारा नेता निवडण्याची प्रगल्भता समाजात निर्माण व्हायला हवी.” भैय्यासाहेब आंबेडकर आणि त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी बौद्धांना केंद्रीय कोट्यातून देखील सवलतीचे लाभ मिळावे यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत आता पुन्हा मोठा लढा उभारण्याची गरज असल्याचे आवाहन देखील भोजने यांनी केलं.
या सोहळ्यात धम्म चळवळीच्या बळकटीकरणासाठी काही महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. यामध्ये अभिजात पाली भाषा सर्व महाविद्यालयांत शिकवण्यात यावी,
प्रत्येक तालुक्यात पाली भाषा शिकवणी केंद्र सुरू करावे, बौद्ध संस्कारांची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी, विधी वेळेवर पार पाडले जावेत तसेच महापुरुषांची जयंती ‘डीजे’ मुक्त करून वैचारिक पद्धतीने साजरी करावी.
यावेळी बीड जिल्ह्यातील ११ ही तालुक्यांतील सक्रिय धम्मप्रचारक, बौद्धाचार्य आणि समता सैनिक दलाच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारत तांगडे, ॲड. रविकांत उघडे, बाबासाहेब जाधव, अशोक कांबळे, सुभाष बोराडे, लक्ष्मण जाधव, विशाल उघडे, विकास डोंगरदिवे, सुमेध जाधव, बिभीषण उघडे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास जिल्ह्यातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य व सर्व पदाधीकारी, जिल्हयातील सर्व समता सैनिक, सदधम्म सेवा संघाचे व त्रैलोक्य बौद्ध संघाचे बीड जिल्ह्य़ातील सर्व धम्म प्रचारक उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष भारत तांगडे यांनी केले.















