
विकासाबाबत सकारात्मक चर्चा
भुवनेश्वरी धर्मपुरीवार चंद्रपूर रिपोर्टर प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रशासकीय इतिहासात नवा अध्याय जोडला गेला असून २०१७ बॅचच्या आयएएस अधिकारी वसुमना पंत यांनी जिल्ह्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांची भेट घेत स्वागत करत चंद्रपूरच्या विकास कामांसंदर्भात चर्चा केली आहे.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, मनपा गट नेते शेखर शेट्टी, महामंत्री रविंद्र गुरुनुले, नगर सेवक संजय कंचर्लावार आदिंची उपस्थिती होती.
माता महाकालीच्या पवित्र नगरीत नवीन जबाबदारी स्वीकारणार्या जिल्हाधिकार्यांचे स्वागत करताना आमदार जोरगेवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय महत्त्वाचा असल्याचे सांगितले. यावेळी विविध विकासकामे, प्रलंबित प्रश्न आणि जिल्ह्याच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवर सकारात्मक चर्चा झाली.
संवादादरम्यान जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी विकासाबाबतची स्पष्ट दृष्टी, काम करण्याची ऊर्जा आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला. त्यांच्या विचारांतून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस नियोजन दिसून येत असल्याचे आमदार जोरगेवार यांनी सांगितले.
प्रशासनाच्या सक्षम नेतृत्वामुळे विकासकामांना गती मिळते. जिल्हाधिकारी म्हणून त्यांच्या कार्यकाळात चंद्रपूरच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास आमदार जोरगेवार यांनी यावेळी व्यक्त केला.
या भेटीत जिल्ह्याच्या पायाभूत सुविधा, ग्रामीण विकास, नागरी सुविधा तसेच विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात चर्चा करण्यात आली. आगामी काळात प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून चंद्रपूर जिल्हा विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.















