
अश्रू दुःखाचे गिळूनी
वाट सुखाची धरावी,
मनी ठेऊनी धारिष्ट्य
सदा प्रगती करावी. (१)
दुःख अन् वेदनेत
जीव सारा व्यापलेला,
सुख शोधाया जीवनी
उर बघा तापलेला. (२)
जीवनाला वेढलेला
संकटांचा महापूर,
थिजलेल्या अपेक्षांना
लावू जगण्याचे सूर. (३)
यातनांच्या आभाळाला
निरामय गवसणी,
पार करूनी क्षितिज
सुख लावू वळचणी. (४)
जगण्याची नाव जरी
सापडली वादळात,
वल्हवित नेक दिशा
नेऊ सुखी किना-यात. (५)
स्वप्ने घेऊ खांद्यावर
जिद्द ठेऊनी मनात,
मिळे फळ सत्कर्माचं
उतरवू प्रत्यक्षात. (६)
आळसाला झटकूनी
जागवावी चैतन्यता,
करू सामना दुःखाचा
बाळगूनी तत्परता. (७ )
जाऊ सुखाच्या शोधात
ठेऊ दुःखाला किनारी,
होऊ सफल परिक्षा
नाही व्हायचं माघारी. (८)
रवि ताकसांडे
गडचांदुर जि. चंद्रपूर















