
शिवाजी महाराज शिल्प परिसरात कोरीव काम, विद्युतीकरण, सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर दि. 02 : चंद्रपूर जिल्ह्याला गौरवशाली इतिहास व संस्कृती आहे. मात्र चंद्रपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरुढ पुतळा नाही. त्यामुळे चंद्रपूर शहरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात येईल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चंद्रपूर जिल्ह्यातील असल्यामुळे हा विषय आपण लवकरच त्यांच्या कानावर टाकू. लोकसहभागातून पुतळ्यासाठी निधी गोळा करायचा असून सर्वांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले.
शहरातील शिवाजी महाराज शिल्प परिसरात कोरीव काम, विद्युतीकरण, सौंदर्यीकरण कामाचे भुमिपूजन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर महापौर संगिता खांडेकर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, उपमहापौर प्रशांत दानव, स्थायी समिती सभापती मनस्वी गि-हे, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, उपायुक्त संदीप चिद्रावार यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.
महापुरुषांचे स्मरण आणि अभिवादन करण्यासाठी आपणास एकत्र येत असतो, असे सांगून पालकमंत्री डॉ. वुईके म्हणाले, लोक चळवळीच्या माध्यमातून येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहावा, अशी लोकभावना आहे. मी स्वत: या पुतळ्याच्या उभारणीकरीता निधी देणार आहे. शहरातील प्रत्येक प्रभागाचा विकास करण्यास आपण कटिबद्ध आहोत. महानगर पालिकेला तसेच नगरसेवकांना विकासासाठी निधी देण्यात येईल. नगरसेवकांनी पावसाळ्यापूर्वी शहरातील स्वच्छता, नाल्यांची साफसफाई, घनकचरा व्यवस्थापन आदी कामे करावी. चंद्रपूरचा नावलौकिक वाढविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. वुईके यांनी केले.
खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत असून त्यांचा चंद्रपूर शहरात पुतळा होणे, हे आपले सौभाग्य आहे. महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणीसाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी पुढाकार घेतला आहे. येथे चांगले सौंदर्यकरण होईल, असा विश्वास आहे.
आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, चंद्रपूर हे ऐतिहासिक शहर आहे. चंद्रपुरात शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा नव्हता. आज पालकमंत्र्यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन झाले. आपल्या स्थानिक विकास निधीतून या परिसराच्या विकासासाठी 39 लक्ष रुपये देण्यात आले आहे. लोकवर्गणीतून हा पुतळा उभा राहत असल्याने, यासाठी आपला तीन महिन्यांचा पगार जवळपास 5 लक्ष रुपये आपण देणार आहोत. तसेच राजमाता जिजाऊ, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे शिल्प शासकीय विश्रामगृह येथे करावे. त्यासाठी स्थानिक विकास निधीमधून 50 लक्ष रुपये देण्यास आपण तयार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात आयुक्त अकुनुरी नरेश म्हणाले, या परिसराचे विद्युतीकरण, वृक्षारोपण, सौंदर्यीकरण आणि कोरीव कामासाठी 95 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे. त्यात खनिज विकास निधीतून आणि स्थानिक विकास निधीतून पैसे देण्यात आले आहे. सदर काम पूर्ण करण्याचा कालावधी सहा महिन्याचा आहे.















